पोलीस आणि महानगरपालिका प्रशासनाकडून लोकांना वारंवार मास्क घालण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र, लोक या सूचना गांभीर्याने घेताना दिसत नाहीत.
औरंगाबाद: कोरोनाच्या (Coronavirus) वाढत्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर औरंगाबादमध्ये पोलीस प्रशासनाने मोठा निर्णय घेतला आहे. त्यानुसार आता औरंगाबाद शहरात रिक्षाचालक विनामास्क वाहन चालवताना आढळला तर त्याची रिक्षा (Autrikshaw) जप्त केली जाईल. या निर्णयाचे मोठे पडसाद उमटण्याची शक्यता आहे.
औरंगाबादमध्ये तब्बल 35 हजारांपेक्षा जास्त रिक्षाचालक असून ते दररोज प्रवाश्यांना घेऊन शहरातील गल्लोगल्ली आणि इतरत्र फिरत असतात. त्यांनी मास्क न परिधान केल्यास कोरोनाचा मोठ्याप्रमाणावर प्रसार होण्याची शक्यता आहे. यापूर्वी पोलीस आणि महानगरपालिका प्रशासनाकडून लोकांना वारंवार मास्क घालण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र, लोक या सूचना गांभीर्याने घेताना दिसत नाहीत. त्यामुळे आता पोलीस प्रशासनाने संबंधितांवर कठोर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. याचाच एक भाग म्हणून आता रिक्षाचालकांवर कारवाई केली जात असल्याची माहिती औरंगाबादचे पोलीस आयुक्त डॉ. निखील गुप्ता यांनी दिली.
होम आयसोलेशन पर्याय आता बंद
कोरोना बाधितांची वाढती रुग्ण संख्या लक्षात घेता औरंगाबाद महानगरपालिकेने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. कोरोनाबाधितांची संख्या ही आता दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे. अनेक कोरोना रुग्णांच्या घरातील लोकांनाही व्हायरसची लागण झाल्याचे आढळून आले आहे.
त्यामुळे आता महानगरपालिकेच्या वतीने होम आयसोलेशन पर्याय बंद करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे.
आयसोलेशनच्या ऐवजी बाधितांना कोविड केअर सेंटर किंवा खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल व्हावे लागेल. शहरातील कोरोना बाधितांची संख्या ही दहा टक्क्यांनी वाढत चाललेली आहे. तसेच आगामी काळामध्ये देखील रुग्ण वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे हा बचावाचा उपाय म्हणून महानगरपालिकेने पाऊल उचलले आहे.

