खेड उपअधीक्षक भुमी अभिलेख कार्यालयाचा भोंगळ कारभार उघडकीस
खेड (प्रतिनिधी : बबनराव खेसे) | दि.07: खेड उपअधीक्षक भुमी अभिलेख कार्यालयातील गंभीर अनियमिततेचा भोंगळ कारभार समोर आला आहे. दावडी गावातील सर्वे नं. ३३५/४ब व गट नं. ३४७/१/२ या जमिनींच्या संपादन व नोंद प्रक्रियेमध्ये अनेक विसंगती आणि दुर्लक्ष झाल्याचे उघड झाले आहे.उपसंचालक (पुनर्वसन) तथा जिल्हाधिकारी, पुणे यांच्या नावावर सर्वे नं. ३३५/४ब क्षेत्रफळ ०.१५ आर नमूद आहे. तसेच गट नं. ३४७/१/२ क्षेत्रफळ १.९९ आर संपादन झालेले असून नकाशात ते २.१४ आर असे दाखविण्यात आले आहे. मात्र, दावडी येथील गट नं. ३३५/४ब क्षेत्र ०.१५ आर हे संपादन सिटवर कुठेही संपादित झाल्याचे नोंदीत दिसत नाही.
तपासणीअंती असे स्पष्ट झाले की, गट नं. ३४७/१/२ चे संपादन करताना प्रारंभी १ हेक्टर ७४ आर क्षेत्राचे संपादन झाले होते. त्यात गट नं. ३३५/४ब मधील ४० आर क्षेत्राचा समावेश करण्यात आला, ज्यामुळे एकूण संपादन क्षेत्र २.१४ आर असे दाखविण्यात आले.संयुक्त मोजणी पत्रकाच्या परीक्षणातही गट नं. ३३५/४ मधील ०.४० आर क्षेत्र गट नं. ३४७/१ मध्ये हस्तांतरित करण्यात आले असल्याचे दिसून येते. त्यानुसार दुरुस्तीची नोंद संयुक्त मोजणी पत्रकात करण्यात आली आहे.
तथापि, दि. २०/१२/२०२४ रोजी उपअधीक्षक भुमी अभिलेख, खेड यांनी दिलेल्या पत्रात गट नं. ३३५/ब या जमिनीचे संपादन सिटवर कोणतीही नोंद आढळत नाही असे स्पष्ट नमूद केले आहे. अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे सदर जमीन चुकीने जिल्हा पुनर्वसन अधिकारी यांच्या नावावर दाखल करण्यात आली असल्याचे दिसून येते.या प्रकरणात दुरुस्ती लिपिक श्रीमती ए. टी. मंदवाड, तपासणी अधिकारी श्रीमती एस. आर. रावते आणि मंजुरी अधिकारी श्री. नितीन सुर्यवंशी (उपअधीक्षक, भुमी अभिलेख, खेड) यांच्याकडे दुरुस्तीचे पत्र भूसंपादन २६ क्रमांक सिद्धांत भंडारी साहेबांनी पाठवूनही आजपर्यंत आवश्यक दुरुस्ती करण्यात आलेली नाही.
सन १९९२ साली या जमिनींची फाळणी स्कॅन पूर्ण झालेली असून गट नं. ३३५/४ब आणि ३४७/१/२ चे संपादन व फाळणी रेकॉर्डमध्ये स्पष्टपणे दर्शविलेले आहे. केवळ तलाठी कार्यालयातील नोंदींची दुरुस्ती बाकी असल्याचे अधिकृत अहवालात नमूद करण्यात आले आहे.
अनेक वेळा लेखी अहवाल देऊनही खेड भुमी अभिलेख कार्यालयातील अधिकारी व तलाठी वर्ग कुणाच्या तरी दबावाखाली निष्क्रिय राहिले असल्याची गंभीर तक्रार नागरिकांकडून करण्यात आली आहे. संबंधित अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई करण्यात यावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.

