अल्लाह को पता था कोरोना आनेवाला है, इसलिए कब्रस्तान बना, असं वादग्रस्त विधान राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केलं आहे.
ठाणे: अल्लाह को पता था कोरोना आनेवाला है, इसलिए कब्रस्तान बना, असं वादग्रस्त विधान राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केलं आहे. आव्हाड यांच्या या विधानावर आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.
मुंब्रा येथील एका नगरसेविकेच्या जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन जितेंद्र आव्हाड यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी नागरिकांशी संवाद साधताना जितेंद्र आव्हाड यांनी हे वादग्रस्त आवाहन केलं. अल्लाह को मालूम था 2011 में कोरोना आनेवाला है. तभी मुंब्रा में 2019 में कब्रस्तान बना, असं वादग्रस्त वक्तव्य आव्हाड यांनी केलं आहे. त्यामुळे वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. आव्हाड हे गेल्या अनेक वर्षांपासून मुंब्रा विधानसभा मतदारसंघातून निवडून येत आहेत. मात्र, आता कोरोनाच्या संकटातील आपले यश – अपयश झाकण्यासाठी त्यांनी थेट अल्लाचाच आधार घेतल्याची टीका होऊ लागली आहे. कोरोनाचे संकट येणार हे अल्लाहला 2011 सालीच दिसले म्हणून 2019ला कब्रस्तान बनले, असे अंधश्रद्धेला खतपाणी घालणारे विधान करून मुस्लिम समाजाला खुश करण्याचे राजकारण आव्हाड यांनी केल्याचे व्हिडिओवरून दिसत आहे. आव्हाड यांच्या या वादग्रस्त वक्तव्याचा व्हिडीओ सोशल मीडियावरून चांगलाच व्हायरल झाला असून त्यावर आव्हाड यांनी अद्याप कोणताही खुलासा केलेला नाही.
तुम्ही म्हणता जे काही होतं ते अल्लाच करतो. हे कब्रस्तानही अल्लानेच बनवले आहे, असंही आव्हाड यांनी म्हटलं आहे. आव्हाड यांच्या या विधानावर आश्चर्य व्यक्त केलं जात असून त्यावर संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत.
फोन टॅप होत असल्याचा संशय
दरम्यान, आव्हाड यांनी त्यांचा फोन टॅप होत असल्याचा दावा केला आहे. मध्यरात्री दीड वाजता त्यांनी या आशयाचे एक ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये त्यांनी ‘मला माझा फोन टॅप होत असल्याचा संशय येत आहे. विशेष म्हणजे काही एजन्सीजकडून माझ्या व्हॉट्सअॅपवरही निगराणी राखली जात असल्याचं मला वाटत आहे,” असे जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलंय.
रोख कुणाकडे?
आव्हाड यांनी मध्यरात्री दीड वाजता त्यांचा फोन टॅप होत असल्याचं म्हटल्यामुळे खळबळ उडाली आहे. जितेंद्र आव्हाड यांनी तसा आरोप करताना कोणाचेही नाव न घेतल्यामुळे त्यांचा रोख नेमका कोणाकडे आहे, यावर अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. यापूर्वी 24 जानेवारी 2020 रोजी शिवसेना खासदार संजय राऊत यांनीसुद्धा फोन टॅपिंगसदर्भात अनेक गंभीर आरोप केले होते. त्यांनी थेट भाजपचे नाव घेऊन एका भाजपच्याच एका माजी मंत्र्याने त्यांचा फोन टॅप होत असल्याचं सांगितल्याचं दावा केला होता. राऊतांच्या या दाव्यामुळे महाराष्ट्रात खळबळ उडाली होती. त्यानंतर महाविकास आघाडी सरकारने भाजप सरकारच्या काळातील फोन टॅपिंग प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले होते.

