Corona Vaccine : लसीकरण केंद्रांवरील गर्दी टाळण्यासाठी मोठा निर्णय, आदित्य ठाकरेंची महापालिका आयुक्तांशी चर्चा

0 झुंजार झेप न्युज

लस घेण्यासाठी लसीकरण केंद्रांवर नागरिकांची मोठी गर्दी होत आहे. या पार्श्वभूमीवर पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी मोठा निर्णय घेतला आहे.

मुंबई : राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी लॉकडाऊनचा निर्णय घेतला असला तरी गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेली रुग्णवाढ अद्यापही कायम आहे. या पार्श्वभूमीवर लसीकरण मोहिमेवर राज्य सरकारने लक्ष केंद्रीत केलं आहे. दरम्यान, राज्यात कोरोना लसीचा मोठा तुटवडा भासत आहे. तर लस घेण्यासाठी लसीकरण केंद्रांवर नागरिकांची मोठी गर्दी होत आहे. या पार्श्वभूमीवर पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी मोठा निर्णय घेतला आहे.

मुंबईतील कोरोना लसीकरण केंद्रांवरील गर्दी लक्षात घेता लसीकरण केंद्रांची संख्या वाढवण्याबाबत आपण मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल चहल यांच्याशी चर्चा केली आहे. त्याबाबत लवकरच दिशानिर्देश जारी केले जातील, अशी माहिती आदित्य ठाकरे यांनी ट्विटरद्वारे दिली आहे.

मुंबईत लसीकरण केंद्राबाहेर 2 किलोमीटरपर्यंत रांगा!

गेल्या काही दिवसांपासून मुंबईच्या गोरेगावमधील नेस्को कोरोना केंद्र आणि बीकेसी केंद्रावर लसीकरणासाठी नागरिकांच्या रांगाच रांगा लागलेल्या पाहायला मिळाल्या. लसींचा तुटवडा असल्याने आपल्यालाच लस मिळावी म्हणून नागरिकांनी 29 एप्रिल रोजी पहाटे 7 वाजल्यापासून केंद्रावर गर्दी केल्याने दोन किलोमीटरपर्यंत ही रांग केली होती. मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी त्याची दखल घेतली. नागरिकांनी केंद्रावर गर्दी करू नये. कोविन अॅपवर नोंदणी करणाऱ्यांनाच लस मिळणार आहे. तसेच ज्यांचा पहिला डोस झालेला आहे, त्यांनाच प्राधान्याने डोस दिला जाणार असल्याचं पेडणेकर यांनी स्पष्ट केलं.

गोरेगावच्या नेस्को केंद्रावर आणि वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स केंद्रावर नागरिकांची गर्दी झाल्याने त्यावर महापौर किशोरी पेडणेकर यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. सर्वांनाच व्हॅक्सिन मिळणार आहे. लस जशी उपलब्ध होईल, तशा लस देण्यात येणार आहेत. गोरेगावच्या नेस्को केंद्रावरील गर्दी चिंताजनक आहे. नागरिकांनी प्रत्येक सेंटरवर अशी गर्दी केली तर बाधित होण्याची शक्यता अधिक आहे. गर्दीत एखादा व्यक्ती जरी बाधित असेल तर दुसऱ्यांना लागण होऊ शकते. त्यामुळे ज्या कारणासाठी लसीकरण होतंय ते बाजूला राहिल. म्हणून नागरिकांनी बोलावल्याशिवाय केंद्रावर येऊ नये, असं महापौर पेडणेकर म्हणाल्या होत्या.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.