कोल्हापुरात सार्वजनिक ठिकाणी मास्क, सॅनिटायझर सक्तीचा केला आहे. कोरोनाविषयक नियम पाळले गेले नाहीत तर थेट फौजदारी कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिले आहेत.
कोल्हापूर : कोल्हापुरात सार्वजनिक ठिकाणी मास्क, सॅनिटायझर सक्तीचा केला गेला आहे. जर नागरिकांनी नियमाचे पालन नाही केले तर संबंधितांवर फौजदारी कारवाई करणार असल्याचं कोल्हापूरचे जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी सांगितलं आहे.
संपूर्ण राज्यात कोरोनाने पुन्हा एकदा डोकं वर काढलं आहे.विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र तसंच पश्चिम महाराष्ट्रातल्या शहरांत कोरोनाचे रुग्ण पुन्हा एकदा वाढायला सुरुवात झाली आहे. कोल्हापुरातही कोरोनाचे रुग्ण मिळू लागलेले आहेत.
लग्नसमारंभ आणि मेळावे 50 टक्के उपस्थितीतच तर अंत्यसंस्काराला 20 लोकांची परवानगी
सार्वजनिक ठिकाणी मास्क, सॅनिटायझर सक्तीचा, अन्यथा फौजदारी कारवाई होणार आहे. लग्नसमारंभ, राजकीय मेळावे, सभा खुल्या जागेवर घेता येणार नाही. बंदिस्त सभागृहात परवानगी असेल. लग्नसमारंभ आणि मेळावे बंदिस्त जागेत तसंच 50 टक्के उपस्थितीतच (हॉलच्या 50 टक्के) करावे लागणार असल्याचा आदेश जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी काढला आहे. तसं अंत्यसंस्कारासाठीही 20 लोकांनाच उपस्थित राहता येणार आहे.
आठवडा बाजार सुरु, यात्रा-जत्रेवरील निर्बंध कायम
आठवडा बाजार सुरुच राहणार आहेत. फक्त नियमांचं पालन होत आहे की नाही ते पाहणे अधिकाऱ्यांना सक्तीतं केलं आहे. यात्रा जत्रा यांच्यावरील निर्बंध अद्यापही आहेत. मंदिरे खुली आहेत पण सोशल डिस्टन्स पाळणे अत्यंत आवश्यक आहे
कोल्हापुरातील कन्हैया कुमारची सभा रद्द
कोल्हापुरात विद्यार्थी नेता कन्हैया कुमारची सभा होणार होती. मात्र कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर ही सभा रद्द करण्यात आली आहे. कायदा-सुव्यवस्थेचं कारण देत पोलिसांनी या सभेला परवानगी नाकारली. मात्र संयोजक सभा घेण्यावर ठाम होते. अखेर पोलिसांनी या सभेला परवानगी नाकारली आहे. गोविंद पानसरे यांच्यासह सहाव्या स्मृतीदिना यानिमित्त एआयएसएफ कडून दसरा चौकात सभेचं नियोजन करण्यात आलं होतं.

