विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीला जाऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतल्याचं स्पष्ट केलं आहे. हल्ली मी कोणत्याही कारणाने दिल्लीत गेलो तर त्याची पतंगबाजी होते.
नागपूर: विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीला जाऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतल्याचं स्पष्ट केलं आहे. हल्ली मी कोणत्याही कारणाने दिल्लीत गेलो तर त्याची पतंगबाजी होते. आज दिवसभर पतंगबाजी सुरू होती. ही पतंगबाजी पाहूना माझं मनोरंजन झालं, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय.
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मीडियाशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली. मी दिल्लीत गेलो होतो. नागपूरचं एक शिष्टमंडळ घेऊन गेलो होतो. धर्मेंद्र प्रधान यांची भेट घ्यायची होती. त्यांच्या भेटीला उशिर होता म्हणून अमित शहा यांना फोन केला. तर त्यांनी 15 मिनिटं आहेत, भेटायला येऊ शकतो म्हणून सांगितलं. त्यामुळे त्यांची भेट घेतली. मी कोणत्याही कारणाने दिल्लीत गेलो तर पतंगबाजी होते. आज दिवसभर ही पतंगबाजी सुरू होती. त्यामुळे माझं मनोरंजन झालं, असं फडणवीस म्हणाले.
‘त्या’ निर्णयाचं स्वागत
ओबीसींचा इम्पिरीकल डेटा गोळा करण्यासाठी राज्य सरकारने अधिसूचना काढली असेल तर त्याचं स्वागत करतो. काही हरकत नाही. देर आये पर दुरुस्त आये, असं ते म्हणाले. केंद्र सरकारडे इम्पिरीकल डेटा नाही. सेन्सस डेटा आहे. हे पॉलिटिकल रिझर्व्हेशन आहे. त्यामुळे राज्यालाच इम्पिरीकल डेटा गोळा करावा लागेल, असं त्यांनी स्पष्ट केलं.
चौकशी राजकीय हेतूने नाही
यावेळी त्यांनी जरंडेश्वर कारखान्यावर ईडीने केलेल्या कारवाईचं समर्थन केलं. कोर्टाच्या आदेशानुसारच ही कारवाई झाली आहे. राजकीय हेतूने प्रेरित होऊन ही चौकशी झालेली नाही. जरंडेश्वर कारखान्याबाबत मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. त्यावेळी हायकोर्टाने पोलिसांना एफआयआर दाखल करण्याची सूचना केली होती. हे लोक सर्वोच्च न्यायालयात गेले होते. मात्र सुप्रीम कोर्टाने हस्तक्षेप करण्यास नकार दिला होता. त्यामुळे पोलिसांनी एफआयआर दाखल केला. त्यात मनी लॉन्ड्रिंगचा अँगल होता. त्यावेळी ईडीने ईसीएआयआर दाखल केला होता. त्यानुसार ईडीची चौकशी सुरू आहे. त्यावेळी आमचं सरकार होतं. पण तरीही ही चौकशी कोर्टाच्या आदेशानेच होत आहे, असं त्यांनी स्पष्ट केलं.
लोकशाहीला पायदळी तुडवण्याचा प्रकार
राज्य सरकारने केवळ दोनच दिवसांचं अधिवेशन ठेवल्याबद्दलही त्यांनी टीका केली. या अधिवेशनात लक्ष्यवेधी असणार नाहीत. तारांकित प्रश्न असणार नाहीत. कोणतंही आयुध वापरता येणार नाही. विधानसभेत आयुधच वापरायचं नाही हा ठराव होत असेल तर विधिमंडळाचं कामकाज फासावर लटकवण्यासारखच आहे. लोकशाहीला पायदळी तुडवण्याचा हा प्रकार आहे, असं सांगतानाच आम्ही बोलूच नये असं त्यांना वाटत असेल तर आम्ही माध्यमांसमोर येऊन बोलू, असं त्यांनी सांगितलं.

