प्रगतीपथावर असणारे जलसंधारणाचे प्रकल्प लवकर पूर्ण करा-जलसंपदा मंत्री जयंत पाटील

0 झुंजार झेप न्युज

प्रगतीपथावर असणारे जलसंधारणाचे प्रकल्प लवकर पूर्ण करा-जलसंपदा मंत्री जयंत पाटील

औरंगाबाद,दि.26 : जिल्ह्याचा सर्वांगीण विकास साध्य करण्यासाठी शेतीला मोठ्या प्रमाणात पाणी मिळणे आवश्यक आहे. शेतीला पाणी मिळण्यासाठी जिल्ह्यातील प्रगतीपथावर असलेल्या प्रकल्पांची कामे  लवकर पुर्ण करण्याचे निर्देश  जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी आज येथे दिले. जलसंपदा विभागामार्फत आयोजित गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाची बैठक जलसंपदा मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती यावेळी ते बोलत होते.

यावेळी महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार, खासदार इम्तियाज जलील, आमदार सर्वश्री हरीभाऊ बागडे, अंबादास दानवे, सतीष चव्हाण, रमेश बोरनारे, विक्रम काळे,उदयसिंह राजपुत, संजय सिरसाट,अपर जिल्हाधिकारी डॉ. अनंत गव्हाणे आदी उपस्थित होते. 

जलसंपदा मंत्री म्हणाले की, जायकवाडी धरणाच्या उजव्या आणि डाव्या कालव्याची दुरूस्ती करण्यासाठीचा प्रस्ताव तयार करण्यात येत आहे. या कालव्यांची वहन क्षमता कमी झाल्याने या क्षेत्राचे संपूर्ण सर्व्हेक्षण करण्याचे निर्देश दिले असून प्रस्ताव प्राप्त होताच पुढील कार्यवाहीसाठी सदरचा प्रस्ताव जागतिक बँकेकडे पाठविण्यात येईल. जिल्ह्यातील सर्व कालव्यांची वहन क्षमता वाढविण्याला प्राधान्य देण्यात येणार आहे जेणेकरुन सर्व प्रकल्पांचे पाणी शेवटच्या लाभार्थी शेतकऱ्याला मिळेल. जायकवाडी सह जिल्ह्यातील अनेक प्रकल्पांच्या दुरूस्तीसाठी देखील सर्व्हेक्षण करुन प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश जलसंपदा मंत्री यांनी संबंधित अधिकाऱ्यांना यावेळी दिले.

यावेळी खासदार इम्तियाज जलील यांनी तापी आणि गोदावरी महांमडळाची संयुक्त बैठक घेण्याची विनंती जलसंपदा मंत्री यांना केली यावेळी जलसंपदा मंत्री यांनी अशी संयुक्त बैठक लवकरच घेण्याचे आश्वासन यावेळी दिले. 

आमदार रमेश बोरनारे यांनी वैजापुर तालुक्यातील सेनी देवगांव उच्च बंधारा प्रकल्प पुर्ण करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व परवानग्या लवकरात लवकर देण्याची विनंती जलसंपदा मंत्री यांना केली. तसेच नारंगी-सारंगी धरणामध्ये पालखेड धरणाचे ओव्हर फ्लो होणारे पाणी मिळण्यासाठी प्रयत्न करावे, शिवना टाकळी धरणाचे अनेक कामे अर्धवट आहेत ही कामे लवकर पुर्ण करावेत जेणेकरुन तालुक्यातला पाणी मिळेल, मण्यार धरणाची उंची वाढवावी अशीही विनंती जलसंपदा मंत्री यांना केली.

आमदार हरीभाऊ बागडे यांनी यावेळी फुलंब्री परिसरातील जल प्रकल्पाच्या क्षेत्रातील जमीन संपादनाबाबत असलेला अडथळा दुर करावा जेणेकरुन हा प्रकल्प लवकर पुर्ण होईल अशी विनंती जलसंपदा मंत्री यांना केली.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.