ध्वजनिधी संकलनाचा शुभारंभ; यंदा 1 कोटी 10 लक्ष रूपये उद्दिष्ट
अमरावती,दि.7: सैनिक बांधव जीवाची बाजी लावून देशाचे संरक्षण करतात. अनेक सैनिकांनी आपल्या प्राणांचे बलिदान दिले आहे. त्यांच्या हौतात्म्याचे मोल जाणून ध्वजदिन निधीसाठी सढळ हातांनी मदत करावी. यंदा ध्वजनिधी संकलनाचे 1 कोटी 10 लक्ष रूपये उद्दिष्ट निश्चित केले असून, ते प्रजासत्ताक दिनापूर्वी पूर्ण करावे, असे आवाहन ध्वजनिधी संकलन समितीच्या अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी आज येथे केले.
सशस्त्र सेना ध्वज दिनानिमित्त ध्वजदिन 2022 निधी संकलनाचा शुभारंभ जिल्हाधिका-यांच्या उपस्थितीत नियोजनभवनात आज झाला, त्यावेळी त्या बोलत होत्या. मेजर आनंद पाथरकर, कर्नल लक्ष्मणराव गाले, शिवाजी शिक्षण संस्थेचे सचिव विजय ठाकरे, उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मनीषकुमार गायकवाड, माजी सैनिक कल्याण अधिकारी रत्नाकर चरडे, जिल्हा माहिती अधिकारी हर्षवर्धन पवार आदी व्यासपीठावर उपस्थित होते.
युध्द अथवा युध्दजन्य परिस्थीतीत तसेच अतिरेकी कारवायांमध्ये मातृभूमीच्या रक्षणासाठी वीरमरण आलेल्या भारतीय लष्करातील पराक्रमी जवानांच्या बलिदानाची आठवण म्हणून 7 डिसेंबर हा सशस्त्र सेना ध्वजदिन म्हणून संपूर्ण देशात साजरा होतो. सैनिकांच्या ऋणाचे मोल जाणून त्यांच्या कुटूंबियांचे, अवलंबितांचे पुनर्वसन करण्यासाठी ध्वजदिन निधी संकलनातून मदत करण्यात येते.
सन 2021-22 या वर्षासाठी जिल्ह्याने 1 कोटी 27 लक्ष रू. ध्वजनिधी संकलन करून उद्दिष्टाहून अधिक रक्कम संकलित झाली. सन 2022-23 साठी 1 कोटी 10 लक्ष रुपयांचे उद्दिष्ट असून, ते निश्चित पूर्ण होईल, असा विश्वास जिल्हाधिका-यांनी व्यक्त केला. माजी सैनिकांचे निवृत्तीवेतन, शिष्यवृत्ती आदी काही प्रलंबित प्रश्न असतील तर ते प्राधान्याने सोडविण्यात येतील. सैनिक कल्याण कार्यालयासाठी नवीन विभागीय प्रशासकीय इमारतीत जागा मिळवून देऊ, असेही जिल्हाधिका-यांनी सांगितले.
सैन्यदलातील कामगिरीबद्दल सेना पदक प्राप्त मेजर पाथरकर यांना यावेळी गौरविण्यात आले. वीरपत्नी, वीरमाता, गुणवंत पाल्यांचाही गौरव यावेळी झाला. तहसीलदार अभिजित जगताप यांनी अग्नीवीर योजनेच्या कार्यवाहीबाबत माहिती दिली. श्री. चरडे, श्री. गाले यांनीही मनोगत व्यक्त केले. श्री. ठाकरे यांनी शिवाजी शिक्षण संस्थेतर्फे 16 लाख रूपयांचा धनादेश जिल्हाधिका-यांकडे सुपुर्द केला.श्री. गायकवाड यांनी प्रास्ताविक केले. वैभव निमकर यांनी सूत्रसंचालन केले. सैनिक बांधव व त्यांचे कुटुंबिय मोठ्या संख्येने उपस्थित होते.

