‘मेरा रेशीम मेरा अभिमान २.०’ अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी बैठक संपन्न
नांदेड,दि.31 : केंद्र शासनाच्या ‘मेरा रेशीम मेरा अभिमान २.०’ या महत्त्वाकांक्षी अभियानाची नांदेड जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या मार्गदर्शनाखाली आज जिल्हाधिकारी कार्यालयात नियोजन बैठक आयोजित करण्यात आली.
बैठकीस केंद्रीय रेशीम बोर्ड, परभणीचे डॉ. अशोक जाधव (वैज्ञानिक ‘डी’ तथा संयुक्त संचालक), केंद्रीय रेशीम संशोधन व प्रशिक्षण संस्था, मैसूरच्या डॉ. अंतरा गुप्ता (वैज्ञानिक ‘बी’), जिल्हा रेशीम विकास अधिकारी अशोक वडवळे, पाणलोट प्रकल्पाचे दिनेश खडसे, पाणी फाउंडेशनचे प्रवीण तसेच क्षेत्र सहाय्यक कांचन जाधव, अमर सूर्यवंशी, गजानन काचगुंडे, नरोजी कोरके, अभय कुलकर्णी, दत्ता भोसकटे, आनंद कोल्हे यांच्यासह जैतापूर, धनगरवाडी व भेंडेगाव येथील चौकी केंद्रांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
बैठकीच्या प्रारंभी जिल्हा रेशीम विकास अधिकारी अशोक वडवळे यांनी प्रास्ताविक करत जिल्ह्यातील रेशीम उद्योगाची सद्यस्थिती मांडली. रेशीम शेतीची क्षमता लक्षात घेता अधिकाधिक शेतकऱ्यांनी या उद्योगाकडे वळावे, असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी डॉ. अंतरा गुप्ता यांनी ‘मेरा रेशीम मेरा अभिमान २.०’ अभियानाची उद्दिष्टे, शेतकऱ्यांना मिळणारे लाभ आणि अभियानाची अंमलबजावणी याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच जिल्ह्यात हे अभियान प्रभावीपणे राबविण्यासाठी आवश्यक कृती आराखड्यावर चर्चा करण्यात आली.
डॉ. अशोक जाधव यांनी रेशीम किट संगोपनादरम्यान शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी विशेष कार्यशाळा, तंत्रज्ञान प्रात्यक्षिके, कौशल्य विकास प्रशिक्षण तसेच आधुनिक रेशीम तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती दिली.
या बैठकीस जिल्ह्यातील विविध तालुक्यांतील रेशीम उत्पादक शेतकरी, चौकीधारक, स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी आणि उद्योगाशी संबंधित घटक मोठ्या संख्येने उपस्थित होते. बैठकीत रेशीम उद्योगासमोरील विविध समस्या, आव्हाने व उपाययोजनांवर सखोल चर्चा करण्यात आली. शेतकऱ्यांनी मांडलेल्या अडचणींचे निराकरण करण्यासाठी आवश्यक उपाययोजनांबाबत मार्गदर्शन करण्यात आले. तसेच शासनस्तरावरील काही मागण्या संबंधित विभागाकडे सादर करण्याचे आश्वासन देण्यात आले.
‘मेरा रेशीम मेरा अभिमान २.०’ हे अभियान सप्टेंबर २०२६ पर्यंत जिल्ह्यात विविध जनजागृती, प्रशिक्षण व तांत्रिक मार्गदर्शन उपक्रमांद्वारे राबविण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
