हिंजवडीतील नागरी प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी कालबद्ध कृती आराखडा तयार करा : उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार
पुणे,दि.03 : हिंजवडी परिसरातील वाढती लोकसंख्या, आयटी उद्योगांचा विस्तार आणि त्यानुषंगाने निर्माण झालेल्या नागरी व पायाभूत सुविधांच्या प्रश्नांवर तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी दिले.
पुणे येथे झालेल्या आढावा बैठकीत हिंजवडी परिसरातील रस्ते, वाहतूक कोंडी, कचरा व्यवस्थापन, मेट्रो तसेच इतर प्रलंबित नागरी सुविधांच्या प्रश्नांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. या प्रश्नांच्या कायमस्वरूपी सोडवणुकीसाठी संबंधित विभागांनी ठोस कृती आराखडा तयार करून त्याची कालबद्ध पद्धतीने अंमलबजावणी करावी, अशा सूचना उपमुख्यमंत्री पवार यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.
हिंजवडी परिसर हा राज्यातील महत्त्वाच्या आयटी हबपैकी एक असून, येथे दररोज मोठ्या संख्येने नागरिक व कर्मचारी ये-जा करतात. त्यामुळे वाहतूक व्यवस्था, रस्ते आणि सार्वजनिक सुविधांवर मोठा ताण निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर विविध विभागांमध्ये समन्वय ठेवून प्रलंबित कामांना गती देण्यावर बैठकीत भर देण्यात आला.
बैठकीला आमदार शंकर मांडेकर, उपमुख्यमंत्री यांचे सचिव डॉ. राजेश देशमुख, विभागीय आयुक्त शीतल तेली-उगले, पुणे महापालिका आयुक्त नवल किशोर राम, पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, पीएमआरडीए आयुक्त डॉ. अभिजित चौधरी, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, पीएमपीएमएलचे व्यवस्थापकीय संचालक महेश आव्हाड यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, स्थानिक नागरिक आणि विविध कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
हिंजवडीतील वाहतूक, रस्ते आणि नागरी सुविधांच्या प्रश्नांना आता कालबद्ध पद्धतीने गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

