नवी दिल्ली : जम्मू काश्मीरमधील अनुच्छेद ३७० रद्द करण्याचा निर्णय हा ऐतिहासिक असून त्यामुळे पश्चिमी शेजारी देशाकडून पुकारण्यात आलेल्या छुप्या युद्धाला आळा बसला आहे, असे लष्करप्रमुख मनोज मुकुंद नरवणे यांनी ७२ व्या सेनादिनानिम्मित करियप्पा संचलन मैदानावर आयोजित कार्यक्रमात मंगळवारी सांगितले.
अनुच्छेद ३७० रद्द केल्याने जम्मू काश्मीरला मुख्य प्रवाहात आणण्यास मदतच होईल, असे सांगून ते म्हणाले, की लष्कर दहशतवादाची कुठलीही कृत्ये सहन करणार नाही. जे दहशतवादी कारवाया करतात त्यांच्या विरोधात कारवाईसाठी आमच्याकडे अनेक पर्याय आहेत. नरवणे यांचा सगळा रोख पाकिस्तानवर होता.
दहशतवादाच्या कारवाया करून कुणी आगळीक केली तर त्याला जशास तसे उत्तर दिले जाईल, तसेच त्यासाठी विविध पर्याय वापरले जातील, असे सांगून ते म्हणाले की, दहशतवादाचा ठोसपणे मुकाबला केला जाईल.
या वेळी 'धनुष' व 'के- वज्र' या तोफा प्रणालीचे प्रदर्शन लष्कराच्या संचलनात पहिल्यांदाच करण्यात आले.
दिल्ली कॅन्टोन्मेंट भागातील मैदानावर झालेल्या या कार्यक्रमात जवानांना सेनापदके प्रदान करण्यात आली. सर्व पुरुष जवानांचा समावेश असलेल्या संचलनाचे नेतृत्व चौथी पिढी लष्करात असलेल्या तानिया शेरगिल या लष्कराच्या कॅप्टन महिलेने केले.
संरक्षण प्रमुख बिपीन रावत, लष्करप्रमुख नरवणे, हवाई दल प्रमुख आरकेएस भादुरिया व नौदल प्रमुख अॅडमिरल करमबीर सिंह यांनी राष्ट्रीय युद्ध स्मारकास भेट देऊ न आदरांजली वाहिली. राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी सेना दिनानिमित्त लष्कराला शुभेच्छा दिल्या आहेत.

