नवीन पनवेल येथे एका वाईन शॉपमध्ये दरोड्याच्या तयारीत असलेल्या अट्टल गुन्हेगारांना नवी मुंबई गुन्हे शाखेकडून जेरबंद करण्यात आले.
नवी मुंबई : नवीन पनवेल येथे एका वाईन शॉपमध्ये दरोड्याच्या तयारीत असलेल्या अट्टल गुन्हेगारांना नवी मुंबई गुन्हे शाखेकडून जेरबंद करण्यात आले. पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींपैकी हुसेन भिकू शेख ऊर्फ कल्लू हा सराईत गुन्हेगार फळ मार्केटमध्ये राहत असल्याचे समोर आले आहे. हा आरोपी दिवसा आंबा मौसम चालू झाल्याने लाकडी फळ्यांपासून आंबा पेटी बनवण्याचे काम करत होता आणि रात्रीच्या वेळी घडफोड्या करायचा. त्यामुळे असा अट्टल गुन्हेगार लपण्यासाठी एपीएमसी मार्केटचा आधार घेत असल्याचं समोर आलंय. शिवाय अटक करण्यात आलेल्या गुन्हेगारावर मुंबई आणि नवी मुंबईत गंभीर गुन्हे दाखल आहेत.
आरोपींवर घरफोड्यांचे एकूण 30 ते 35 गुन्हे दाखल, दरोड्याच्या तयारीत असताना पोलिसांनी मुसक्या आवळल्या
गुरुवारी रात्री दरोड्याच्या तयारीत असलेल्या 4 आरोपींना नवी मुंबई पनवेल गुन्हे शाखा पोलिसांनी अटक केलीय. यातील एक आरोपी फरार झाला आहे. हे आरोपी मुंबई, नवी मुंबई परिसरात दिवसा मार्केटमध्ये काम करतात. विशेष म्हणजे ते डिसेंबर आणि जानेवारीमध्येच जेलमधून सुटले आहेत. या आरोपींवर एकूण 30 ते 35 गुन्हे दाखल आहेत. त्यांनी मुंबई आणि नवी मुंबई परिसरात अनेक घरफोड्या केल्या आहेत. एपीएमसी मार्केटमध्ये राहत असलेला आरोपी पूर्वी दानाबंदर परिसरात काम करत होता. आता तो आंबा मौसम असल्याने फळ मार्केटमध्ये काम करत असल्याची माहिती गुन्हे शाखा पोलीस उपायुक्त प्रविण पाटील यांनी दिली.
अटक आरोपी हुसेन भिकू शेख कल्लू याच्यावरील दाखल गुन्हे
1. एपीएमसी पोलीस ठाणे गुन्हा रजि. क्र.137/13 कलम 379,34 भा. द. वि.
2. एपीएमसी पोलीस ठाणे गुन्हा रजि. क्र.153/13 कलम 399,402 भा. द. वि.
3. वाशी रेल्वे पोलीस ठाणे गुन्हा रजि. क्र.64/12 कलम 392,34 भा. द. वि
4. एम आर ए मार्ग पोलीस ठाणे गुन्हा रजि. क्र.117/17 कलम 307,324,504,34 भा. द. वि.
5. एपीएमसी पोलीस ठाणे गुन्हा रजि. क्र.167/20कलम 457,389,34 भा. द. वि
एपीएमसी प्रशासन निष्क्रिय
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत 5 मार्केटमध्ये दिवसभर अथवा ठरलेल्या वेळेत व्यापार अथवा संबंधित कामे करणे आवश्यक आहे. मार्केट हे रहिवासी क्षेत्र नसल्याने येथे राहण्यास कोणालाही परवानगी नाही. परंतू येथे हजारो परप्रांतीय कर्मचारी आणि छोटे व्यापारी राहत आहेत. त्यामुळे या परिस्थितीचा गैरफायदा घेत काही अट्टल गुन्हेगार या ठिकणी वास्तव्य करत असल्याचे पोलीस तपासात स्पष्ट झाले आहे. नवी मुंबईत गुन्ह्याच्या घटनांना आळा घालण्यासाठी एपीएमसी प्रशासनाने येथे बेकायदा वास्तव्य करणाऱ्यांवर बंदी घातली पाहिजे, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.
संचालक आणि व्यापाऱ्यांनी पुढाकार घेण्याची गरज
एपीएमसीमधील अनेक व्यापाऱ्यांना आतापर्यंत आर्थिक नुकसानीचा सामना करावा लागला आहे. त्यामुळे गेल्या अनेक दिवसापांसून असोसिएशन आणि विविध व्यापारी संघटना येथे होणाऱ्या चोऱ्यांवर आळा घालण्याची मागणी होत आहे. परंतू यावर अद्याप कोणताही मार्ग निघत नसल्याने व्यापाऱ्यांमध्ये नाराजीचा सुरु आहे. संबंधित मार्केट संचालक आणि व्यापाऱ्यांनी पुढाकार घेऊन येथे बेकायदा राहणाऱ्या परप्रांतीय लोकांच्या बाबतीत योग्य तो निर्णय घेतला पाहिजे, अशी देखील मागणी केली जात आहे.
व्यापाऱ्यांनो सतर्क रहा
नुकताच एका कलिंगड व्यापाऱ्याला कोट्यावधी रुपयांना गंडा घालून अडीच वर्ष गायब असलेल्या गुन्हेगाराला पोलिसांनी पकडला आहे. त्यामुळे आपल्या गाळ्यावर काम करत असलेला कर्मचारी तसेच त्याच्यासोबत असणारे इतर लोक गुन्हेगारी प्रवृत्तीचे तर नाहीत ना हे व्यापाऱ्यांनी तपासणे आवश्यक आहे. अशा लोकांच्या कोणत्याही आक्षेपार्ह हालचाली लक्षात आल्या तर त्वरित पोलिसांना माहिती देण्याचं आवाहन प्रशासनाने केलंय. आपल्या सोबत काम करणाऱ्या लोकांची इतंभूत माहिती घेऊन ठेवली पाहिजे. शिवाय तात्पुरते किंवा कायम कर्मचाऱ्यांची सखोल चौकशी करूनच त्याला कामाला ठेवणे अपेक्षित आहे. व्यापाऱ्यांनी पार्शवभूमी तपासूनच कामगारांना कामाला ठेवावे. गुन्हेगारी पार्श्वभूमी माहिती असून कामाला ठेवल्यास व्यापाऱ्यांवर देखील कारवाई होणार असल्याचे गुन्हे शाखा पोलीस उपायुक्त प्रविण पाटील यांनी सांगितले.

