जालन्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असून ही चिंतेची बाब आहे.
जालना: जालन्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असून ही चिंतेची बाब आहे. कोरोना रोखण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करा. जिल्ह्यात कोरोनामुळे एकाचाही मृत्यू होता कामा नये, रस्त्यावरून विनामास्क फिरणाऱ्यांना दयामाया दाखवू नका. त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करा, असे आदेशच राज्याचे आरोग्य मंत्री आणि पालकमंत्री राजेश टोपे यांनी दिले.
जालन्यातील वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात प्रशासनातील प्रमुख अधिकाऱ्यांसमवेत आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी राजेश टोपे यांनी या सक्तीच्या सूचना दिल्या. यावेळी जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे, जिल्हा पोलीस अधीक्षक विनायक देशमुख, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रताप सवडे, अपर जिल्हाधिकारी अंकुश पिनाटे, निवासी उपजिल्हाधिकारी केशव नेटके, अतिरिक्त पोलीस अधीक्षक विक्रांत देशमुख, उपजिल्हाधिकारी संदीपान सानप, उप विभागीय अधिकारी भाऊसाहेब जाधव, उप विभागीय अधिकारी शशिकांत हदगल, पोलीस उपअधीक्षक सुधीर खिरडकर, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. पद्मजा सराफ, डॉ. प्रताप घोकडे, मुख्याधिकारी नितीन नार्वेकर, डॉ. सोनखेडकर, अन्न व औषध प्रशासनविभागाच्या अंजली मिटकर आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
टेलिमेडिसीन सुविधेचा लाभ घ्या
जालना जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी आवश्यक ती सर्व साधनसामग्री तसेच मनुष्यबळ उपलब्ध करुन देण्यात आले असून आणखीन आवश्यकता असल्यास सर्व बाबी उपलब्ध करुन देण्यात येतील. परंतु जिल्ह्यात कोरोनामुळे एकाही रुग्णाचा मृत्यू होणार नाही, याची दक्षता घेण्याबरोबरच टेलिमेडीसीनसारखी अत्याधुनिक सेवा जालना जिल्ह्यासाठी उपलब्ध करुन देण्यात आली आहे. त्यानुषंगाने आवश्यकता पडल्यास मुंबई, दिल्लीच्या डॉक्टरांचा सल्लाही या सुविधेमार्फत घेता येऊ शकतो, असं टोपे यांनी सांगितलं.
बिलांची तपासणी करा
कोरोनाबाधित रुग्णांना वेळेत उपचार मिळावेत यादृष्टीने बेडचे व्यवस्थित व निटनेटके नियोजन करण्याबरोबरच खासगी रुग्णालयांमध्ये कोरोनाबाधित रुग्णांकडून अधिकचे पैसे तर घेण्यात येत नाही ना याबाबत खात्री करण्यात येऊन रुग्णांकडून उपचारापोटी देण्यात येणारी देयकांची लेखा परिक्षकांमार्फत नियमितपणे तपासणी करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.
दर दिवशी एक हजार स्वॅबची तपासणी करा
जालना जिल्ह्यात ट्रेसिंग व टेस्टिंगची संख्या वाढविण्यात यावी. जालना जिल्ह्यासाठी स्वतंत्र अशी आरटीपीसीआर लॅब असून या लॅबची दरदिवसाची क्षमता एक हजार स्वॅब तपासणीची असून दरदिवशी एक हजार टेस्ट झाल्याच पाहिजेत. एक हजार स्वॅबपेक्षा अधिक स्वॅब गोळा करण्यात आल्यास अहवालास उशिर होऊ नये. यादृष्टीने स्वॅब औरंगाबाद अथवा पुणे येथे तपासणीसाठी पाठविण्यात यावेत, असे आदेशही त्यांनी यावेळी दिले.
एका रुग्णाच्या संपर्कातील 20 जणांचा शोध घ्या
कोरोना बाधितांच्या संपर्कामधील सहवासितांचा अचूकपणे शोध घेऊन त्यांचे अलगीकरण करण्यावर भर देण्यात यावा. साधारणपणे एका बाधित व्यक्तीच्या संपर्कातील 20 व्यक्तींचा शोध घेण्यात येऊन त्यांचे तातडीने अलगीकरण करण्यात यावे. कोरोना बाधितांच्या सहवासितांचा डेटा नियमितपणे अपलोड होईल, यादृष्टीनेही काळजी घेण्याचे निर्देशही त्यांनी दिले.
कोव्हिड सेंटर सुरू करा
जिल्ह्यामध्ये गतकाळात कोरोना रुग्णांची संख्या कमी झाल्याने सुरु करण्यात आलेले कोव्हिड केअर केंद्र बंद करण्यात आले होते. बंद करण्यात आलेले सर्व कोव्हिड केअर केंद्रे तातडीने व पूर्ण क्षमतेने सुरू करण्यात यावीत. या केंद्रामध्ये ठेवण्यात येणाऱ्या रुग्णांना सर्व सोयी-सुविधा मुबलक प्रमाणात मिळतील याची खबरदारी घेऊन एकाही रुग्णांची तक्रार येणार नाही, याची दक्षता घेण्याचे निर्देशही त्यांनी दिले.
गृहविलगीकरणातील कुणालाही बाहेर फिरू देऊ नका
ज्या व्यक्तींना कोरोनाची सौम्य लक्षणे आहेत व ज्यांच्या घरामध्ये मुबलक प्रमाणात जागा आहे अशा व्यक्तींना होमआयसोलेशन करण्यास परवानगी देण्यात यावी. परंतु ज्यांच्या घरामध्ये मुबलक प्रमाणात जागा नाही तसेच ज्यांना कोरोनाची तीव्र लक्षणे आहेत अशा व्यक्तींचे संस्थात्मक अलगीकरण करण्यावर भर देण्याबरोबरच गृहविलगीकरणामध्ये असलेली कुठलीही व्यक्ती रस्त्यावर फिरणार नाही, याची दक्षता घेण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.
लसीकरणात जालना नंबर वन असावा
जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यासाठी व्हेंटिलेटर, ऑक्सिजन बेड यासह सर्व सोयी-सुविधांनीयुक्त कोव्हिड सेंटर उभारण्यात आलेले असून त्या त्या तालुक्यातील कोरोना रुग्णांवर त्यांच्या तालुक्यात उभारण्यात आलेल्या कोव्हिड सेंटरमध्येच उपचार मिळावेत. कोरोनापासुन बचाव होण्यासाठी लसीकरण मोहिमेला अधिक गती देण्याची गरज असल्याचे सांगत जिल्ह्यात 57 ठिकाणी लसीकरण केंद्रे असून या लसीकरण केंद्राच्या संख्येत वाढ करण्यात यावी. जिल्ह्यातील आरोग्य उपकेंद्रामधूनही लसीकरण करण्याच्या सूचना करत या केंद्रांच्या माध्यमातून अधिक प्रमाणात लसीकरण करण्यात यावे. लसीकरणाच्या बाबतीमध्ये जालना जिल्हा प्रथम क्रमांकावर असावा, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

