भंडारा जिल्ह्यात काही धान खरेदी केंद्राची गोडाऊन हाऊसफुल झाली असल्याने धान खरेदी रखडली आहे.
भंडारा: विदर्भातील प्रमुख पीक म्हणून धानाची ओळख आहे. भंडारा जिल्ह्यात काही धान खरेदी केंद्राची गोडाऊन हाऊसफुल झाली असल्याने धान खरेदी रखडली आहे. याचा फटका शेतकऱ्यांना बसत असून जिल्ह्यात हजारो शेतकरी यांच्याकडे धान पडून आहे. 31 मार्च पर्यंत धान खरेदी करण्याची परवानगी असतानाही शेतकऱ्यांच्या धानाची खरेदी होत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना धान व्यापाऱ्याला विकण्याशिवाय पर्याय उरला नाही, त्यामुळे शेतकऱ्यांनी काय करावं असा प्रश्न पडला आहे.
जुन्या नव्याच्या वादात शेतकऱ्यांची पंचाईत
जिल्हा पणन अधिकारी यांनी जुन्या धान खरेदी केंद्रांवर खरेदी थांबवून नवीन केंद्रांवर धान खरेदी करावी, असे आदेश दिले आहेत. मात्र, काही केंद्रांवर शेतकऱ्यांचे धान घेतले जात नाही आहे. शेतकरी जेव्हा नवीन आधारभूत धान खरेदी केंद्रांवर धान विक्रीला घेऊन गेले असता त्यांना जुन्या धान खरेदी केंद्रावर जाण्याच्या सूचना केल्या जातात. यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या आहेत.
धान मोजलं जात नसल्यानं संकट
शेतकरी जेव्हा नव्या धान खरेदी केंद्रावर माल घेऊन जातात. तेव्हा, त्यांना जुन्या धान खरेदी केंद्रावर 7/12 ची नोंदणी झालीय. आता, नवीन केंद्रावर धान मोजले जाणार नाही अशी माहिती दिली जातीय. शेतकऱ्यांना धान घेऊन परतावं लागत असल्यानं तुमसर तालुक्यातील वारपिंडकेपार येथील अनेक शेतकऱ्यांचे धान घरीच पडून आहेत. धान खरेदी करण्याची मुदत ही 31 मार्च पर्यंत आहे. शेतकऱ्याच्या धानाची उचल झाली नाही तर शेतकऱ्यांना नाईलाजाने व्यापाऱ्यांना धान विक्री करावी लागेल त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होणार आहे.
वारपिंडकेपार गावातील शेतकरी रमेश पारधी यांनी धान विक्री करताना येणाऱ्या अडचणींचा पाढाचं वाचला. ऑनलाईन पद्धतीनं प्रक्रिया सुरु झाली असूनही धान घरी पडल्याचं सांगितलं. जिल्ह्याचे डीएमओ हे हेकेखोरपणे वागत आहेत, असा दावा पारधी यांनी केला. धान मोजण्यासाठी थोडे दिवस राहिलेत. या समस्येवर मार्ग काढावा, अन्यथा जिल्ह्यात हजारो शेतकऱ्यांकडील धान घरीच पडून राहिल, असं पारधी म्हणाले.
धान खरेदी केंद्रावरुन शेतकऱ्यांची फसवणूक करण्यात येत आहे. पणन अधिकारी कार्यालयानं सहा पथक तयार केली असून कोणी दोषी आढळल्यास कडक कारवाई केली जाईल, असं जिल्हा पणन अधिकारी गणेश खर्चे यांनी सांगितले. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या जिल्ह्यात धान उत्पादक शेतकऱ्यांसमोर धान विक्रीची समस्या निर्माण झालीय. नाना पटोले याविषयी कसं लक्ष देतात हे पाहावं लागणार आहे.

