अँटालिया आणि मनसुख हिरेन प्रकरण हाताळण्यात राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख अपयशी ठरले आहेत.
ठाणे: अँटालिया आणि मनसुख हिरेन प्रकरण हाताळण्यात राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख अपयशी ठरले आहेत. या प्रकरणात सर्व पुरावे असतानाही देशमुख यांनी सहायक पोलीस निरीक्षक सचिन वाझे यांचा बचाव करण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी देशमुख यांना ताबडतोब घरी पाठवावं, अशी मागणी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केली आहे.
किरीट सोमय्या यांनी मनसुख हिरेन यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांच्याशी विचारपूस केली. त्यानंतर मीडियाशी बोलताना त्यांनी अनिल देशमुखांची हकालपट्टी करण्यासाठी थेट शरद पवार यांनाच आवाहन केलं. 2004 मध्ये वाझेंची हकालपट्टी करण्यात आली होती. 2007मध्ये ते सेवेतून मुक्त झाले. या दोन्हीवेळा राष्ट्रवादीचाच गृहमंत्री होता. असं असतानाही वाझेंना आता सेवेत घेण्यात आलं आणि चांगली पोस्टिंग दिली. तसेच मनसुख हिरेन प्रकरणात वाझेंना वाचवण्याचा देशमुख यांनी प्रयत्न केला. वाझेंवर कारवाई करण्यात दिरंगाई केली. त्यामुळे देशमुख यांची पवारांनी हकालपट्टी करावी, अशी मागणी सोमय्या यांनी केली आहे. पवारांनी एक तर देशमुख यांची हकालपट्टी करावी किंवा त्यांनीच या प्रकरणावर भाष्य करावं, असंही सोमय्या म्हणाले.
आयपीएस अधिकाऱ्यांचा हात
हिरेन कुटुंबीयांच्या मनात अजूनही भीतीचं वातावरण आहे. मात्र, एनआयए तपास करत असल्याने त्यांचा या तपासावर विश्वास आहे, असंही त्यांनी सांगितलं. अँटालिया आणि हिरेन प्रकरणात वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश होता. हे अधिकारी त्यात गुंतले होते. पुरावा कसा नष्ट करायचा हे त्यांना माहीत होतं. पण या अधिकाऱ्यांना कोण ऑपरेट करत होते हे माहीत नाही, असंही त्यांनी सांगितलं.
हिरेनच दोषी असल्याचं भासवायचं होतं
तू अंगावर आरोप घे, मग मी तुला जामिनावर सोडतो, असं वाझे यांनी हिरेन यांना सांगितलं होतं. या प्रकरणात हिरेन यांना अडकवण्याची वाझेंची आयडिया होती, असं सांगतानाच या सर्व प्रकरणाच्या मागे हिरेन असल्याचं पोलिसांना भासवायचं होतं. पण हिरेन यांनी ते मान्य केलं नाही. त्यामुळेच त्यांची हत्या करण्यात आली. त्यानंतर पोलीस सर्व पुरावे नष्ट करत होते, असा गंभीर आरोपही त्यांनी केला.

