बार्जतून उडी मारुन लाईफ जॅकेटच्या सहाय्यानं 10 तास झुंज सातारच्या अनिल वायचळ यांनी दिली.
सातारा: तौक्ते चक्रीवादळात समुद्रात बुडालेल्या बार्जतून उडी मारुन लाईफ जॅकेटच्या सहाय्यानं 10 तास झुंज सातारच्या अनिल वायचळ यांनी दिली. दुर्घटनाग्रस्त बार्जमधून वाचलेल्या सातारच्या शेरदिल सुपुत्र अनिल वायचळ यांचे मुंबई येथील घरात औक्षण करुन स्वागत करण्यात आलं.
डोंगराएवढ्या लांटाशी यशस्वी झुंज
तौक्ते चक्री वादळामुळे खवळलेल्या समुद्रात बार्ज बुडाल्याने अनिल वायचळ यांनी पाण्यात उडी घेतली. अनिल निवृत्ती वायचळ यांनी डोंगराएवढ्या लाटांशी धाडसाने दिलेली झुंज अखेर यशस्वी ठरली.लाईफ जॅकेटच्या सहाय्यानं तब्बल नऊ तास समुद्रात तरंगत पडलेल्या वांग खोऱ्याच्या मातीतला या शेरदील सुपुत्राची नौदलाच्या पथकाने सुखरूप सुटका केली. गेले तीन दिवस डोळ्यात प्राण आणून त्यांच्या वाटेकडे डोळे लावून बसलेल्या त्यांच्या कुटुंबीय शेजारी व नातेवाईकांचा जीव भांड्यात पडला. अनिल वायचळ यांचे घणसोली नवी मुंबई येथील घरात औक्षण करुन त्यांचे स्वागत करण्यात आले. सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील कुंभारगावच्या वायचळवाडी हे अनिल वायचळ यांचं मूळगाव आहे.
17 तारखेनंतर संपर्क तुटला
अनिल वायचळ हे मुंबईत अँफकॉन इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड कंपनीत कार्यरत आहेत.अरबी समुद्रातील ओएनजीसीच्या प्लॅन्टवर या कंपनीचे काम सुरू असल्याने वादळावेळी सहकाऱ्यांसमवेत ते तिकडे ड्युटीवर कार्यरत होते.त्या सर्वांना चक्रीवादळाबाबत संदेश प्राप्त झाला होता. मात्र, ते ज्यावर थांबलेले होते ते बार्ज मजबूत असल्याने परिस्थिती हाताबाहेर जाईल, असे त्यांना वाटत नव्हते. सोमवारी (17 मे) त्यांनी मोबाईलवरून घरच्यांना मेसेज केला आणि त्यानंतर त्यांचा संपर्कच तुटला.
10 तास पाण्यावर तरंगत राहिले
वादळामुळे समुद्र खवळल्याने उंचच उंच लाटा उसळू लागल्या. अनिल व त्यांचे सहकारी थांबलेल्या बार्जमध्ये पाणी घुसल्याने पाचच्या सुमारास त्यांना लाईफ जॅकेटसह पाण्यात उड्या घेण्याच्या सूचना देण्यात आल्या. त्या घेताना काही जण अडकून भरकटले, तर काही एकमेकांचे हात पकडून पाण्यावर तरंगत राहिले. दहा तास त्यांची जणू जगण्या मरण्याची लढाईच लढली. रात्री अडीच वाजता नौदलाचे बचाव पथक पोचल्यावर त्यांना बोटीवर घेऊन नंतर किनाऱ्यावर आणण्यात आले.
बुधवारी सायंकाळी सहा वाजता ते घणसोली मुंबई येथील घरी परतल्यावर त्यांच्या वाटेकडे डोळे लावून बसलेल्या कुटुंबीय व नातेवाईकांचा जीव भांड्यात पडला. या वेळी सर्वांचेच डोळे आनंदाश्रूनी डबडबले होते.

