पंतप्रधान मोदींब्बदल मुंबईत झालेली पोस्टरबाजी, मोदींनी गुजरातला जाहीर केलेली मदत, मराठा आरक्षण, तौत्के चक्रीवादळात झालेलं नुकसान आदी विषयांवरही गृहमंत्र्यांनी भूमिका माडलीय.
नागपूर : पद्दोन्नतीतील आरक्षण रद्द करण्याच्या निर्णयाला तूर्तास स्थगिती देण्यात आली आहे. ठाकरे सरकारने हा मोठा निर्णय घेतला. या निर्णयाबाबत बोलताना गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. पदोन्नतीचा विषय मार्ग लावला आहे. आता पोलीस भरतीबाबत आम्ही काम करतोय. याबाबतही लवकरच निर्णय जाहीर करु, असं वळसे-पाटील म्हणाले. याचबरोबर पंतप्रधान मोदींब्बदल मुंबईत झालेली पोस्टरबाजी, मोदींनी गुजरातला जाहीर केलेली मदत, मराठा आरक्षण, तौत्के चक्रीवादळात झालेलं नुकसान आदी विषयांवरही गृहमंत्र्यांनी भूमिका माडलीय.
मुंबईतील घाटकोपरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात बॅनरबाजी करण्यात आलीय. याबाबत विचारले असता पंतप्रधानाबद्दल झालेली पोस्टरबाजी हा पोलीस आयुक्तांच्या पातळीवरचा विषय, त्याबाबत मी वाच्यता करणे योग्य नाही, असं वळसे पाटील म्हणाले. त्याचबरोबर तोत्के चक्रीवादळात गुजरातसह कोकणालाही मोठा फटका बसलाय. पंतप्रधान मोदी यांनी गुजरातला 1 हजार कोटीच्या मदतीची घोषणा केलीय. पण महाराष्ट्रासाठी मदत जाहीर केली नाही. त्यावर बोलताना वळसे-पाटील म्हणाले की, केंद्राने गुजरातला मदत केली याबद्दल तक्रार असण्याचे काही कारण नाही. मात्र, त्यासोबत महाराष्ट्रालाही मदत मिळायला हवी.
..ही न शोभणारी गोष्ट- वळसे-पाटील
तौत्के चक्रीवादळाच्या तडाख्यात अनेकांचा जीव गेला. चक्रीवादळात एवढ्या लोकांचा दुर्दैवाने मृत्यू झाला. सर्व ठिकाणी अलर्ट जारी करण्यात आला होता. त्याबाबत नियोजनही चांगल्या पद्धतीने करण्यात आलं होतं, असं वळसे पाटील म्हणाले. तसंच बार्ज पी – 305 च्या दुर्घटनेबाबत केंद्र सरकारने चौकशीचे आदेश दिले आहेत. त्याप्रमाणे जी कारवाई आवश्यक असेल ती होईल. मात्र, एवढ्या मोठ्या प्रमाणात लोकांचा मृत्यू होणं ही शोभणारी गोष्ट नाही, असं मतही वळसे-पाटील यांनी व्यक्त केलंय.
संभाजीराजे छत्रपती संतापले
मराठा आरक्षणासाठी राज्यभरात आंदोलन करण्यासाठी आग्रही असलेल्या भाजपला संभीजीराजे छत्रपती यांनी चांगल्याच कानपिचक्या दिल्या आहेत. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर तोडगा काढण्यासाठी मला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भेट हवी होती. त्यासाठी मी चारवेळेला पंतप्रधान मोदींना पत्रही दिले. मात्र, अद्याप त्यांनी मला भेटीसाठी वेळ दिलेली नाही, असे सांगत संभाजीराजे छत्रपती यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली.
ते गुरुवारी नाशिकमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते. राज्यात भाजपने मराठा आरक्षणासंदर्भात त्यांची भूमिका घ्यावी. मी काही भाजपचा ठेका घेतलेला नाही. त्यांनी मराठा समाजाच्या भावनेशी खेळू नये, त्यावर मार्ग काढावा. आंदोलन काय असतं, हे कोणीही मला शिकवू नये. आक्रमक व्हायला दोन मिनिटं लागतात. आंदोलनाला काय लागतं, आता लगेच करु. पण त्यामध्ये कोणी मयत झाले तर त्याला जबाबदार कोण, शाहुंचा वंशज, असा सवाल संभाजीराजे यांनी उपस्थित केला.

