बोगस बियाणे आढळल्यास होणार तत्काळ कारवाई

0 झुंजार झेप न्युज

▪️ जिल्हाधिका-यांचे कृषि विभागास निर्देश 

 गुणनियंत्रणासाठी नऊ भरारी पथके

 सर्व कृषि सेवा केंद्राची तपासणी करणार

 खरीप हंगामपुर्वी आढावा बैठक

वर्धा,दि.26: एखाद्या शेतक-यांने पेरणी केलेले बियाणे बोगस असल्यास नापिकी होऊन शेतक-यांच्या संपूर्ण कुंटूंबासच त्याचा परिणाम भोगावा लागतो. त्यामुळे जिल्हयात कुठेही बोगस बियाणे विकल्या जाऊ नये. असे बियाणे विक्री होत असल्याचे आढळल्यास संबंधितांवर तत्काळ कारवाई करण्यात यावे, असे निर्देश जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी दिले. जिल्हाधिका-यांच्या अध्यक्षतेखाली आज खरीप हंगामपुर्व आढावा बैठक पार पडली. त्यावेळी त्यांनी सदर निर्देश दिले. बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सचिन ओम्बासे, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी अनिल इंगळे, आत्माच्या प्रकल्प संचालक डॉ. विद्या मानकर, सहकारचे जिल्हा उपनिबंधक एस.एल.भोसले, कृषि विकास अधिकारी अभयकुमार चव्हाण, अग्रणी बँक प्रबंधक वैभव लहाने, नाबार्डचे जिल्हा व्यवस्थापक प्रविण मुळे यांच्यासह कृषि, पाटबंधारे, लघुसिंचन, दुग्ध, मत्स्य व पशुसंवर्धन, विज वितरण आदी विभागाचे अधिकारी उपस्थित होते.खरीप हंगामात बोगस बियाणे विकल्या जाण्याची शक्यता असल्याने र्कृषि विभागाच्या वतीने विशेष भरारी पथके तयार करण्यात आली आहे. त्यात जिल्हा स्तरीय एक तर प्रत्येक तालुका स्तरावर एका पथकाचा समावेश आहे. बोगस बियाणे विकल्या जात असल्याचे निदर्शनास आल्यास संबधित कंपनी व विक्रेत्यावर कारवाई केली जाते. जिल्हयात 1 हजार 450 कृषि निविष्ठा विक्री केंद्रे असून वर्षातून दोनदा या केंद्राची तपासणी केली जाते. कृषि विभागाच्या अधिका-यांना तपासणीसाठी सर्व केंद्र विभागून देण्यात आले आहे. 

खरीप हंगामात 4 लाख 37 हजार हेक्टरवर विविध पिकांची पेरणी होणार असून सोयाबिनसाठी 1 लाख 42 हजार क्विंटल तर इतर पिकासाठी 9 हजार 851 क्विंटल बियाण्यांची आवश्यकता भासणार आहे. जिल्हयाला 90 हजार मेट्रीक टन खताची आवश्यकता असून मागणी प्रमाणे बियाणे व खते उपलब्ध होणार आहे. खतांचा 4 हजार 670 मे.ट. बफर स्टॉक करण्यात आला आहे. 

 खरीप हंगामात बांधावर खते व बियाणे या योजनेतंर्गत 4 हजार 300 शेतक-यांना त्यांच्या शेतावर खते व बियाणे उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. यावर्षी 1 हजार 170 कोटी रुपयांचे पिककर्ज वाटपाचे उद्दिष्ट असून शेतक-यांना वेळेत कर्ज वाटप करण्यात यावे. पात्र शेतक-यांना पिककर्ज मिळाले पाहिजे. जिल्हयात महाबिजने बिजोत्पादनासाठी आपले क्षेत्र वाढवावे, असे निर्देश जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी दिले. 

बियाणे खताच्या तक्रारीसाठी हेल्पलाईन

खरीप हंगामाकरीता जिल्हा व तालुका स्तरावर नियंत्रण कक्ष सुरु करण्यात आले आहे. बियाणे व खतांबाबत प्राप्त तक्रारीरीची नोंद घेऊन त्यावर वेळीच कार्यवाही केली जाणार आहे. शेतकरी बियाणे खताबाबत काही तक्रार असल्यास जिल्हा स्तरीय तक्रार निवारण टोल फ्री क्रमांक 1800 233 4000 व 07152-250099 या क्रमांकावर नोंदवू शकतात.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.