170 शेतकरयांनी एकत्र येऊन सोयाबीनच्या फुले संगम (KDS 726) या वाणाचे उन्हाळी हंगामात पीक घेतलं आहे.
सांगली: एकीचं बळ काय असतं हे सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील शेतकऱ्यांनी दाखवून दिलं आहे. 170 शेतकऱ्यांनी एकत्र येत गटशेतीचा प्रयोग राबवला आहे. यंदाच्या खरीप हंगामात शेतकऱ्यांना बियाण्यांच्या मोठी गरज भासणार आहे. हे लक्षात घेऊन कृषी विभागाने शेतकऱ्यांच्या सहकार्यानं गटशेतीच्या माध्यमातून बियाणे उत्पादनाचा यशस्वी प्रयोग सांगलीच्या वाळवा तालुक्यात यशस्वी केला आहे.170 शेतकऱ्यांनी एकत्रित येत 100 एकरावर सोयाबीन पेरणी केली आहे. यामधून त्यांना 400 क्विंटल उच्च दर्जाच्या सोयाबीनचं उत्पादन होण्याची अपेक्षा असून त्याचा वापर बियाणे म्हणून करण्यात येणार आहे.
कसबे डिग्रज कृषी संशोधन केंद्राचं सहकार्य
संपूर्ण महाराष्ट्रात यंदा बियाणांचा तुटवडा भासणार आहे.गेल्या वर्षी झालेली अतिवृष्टी आणि बोगस बियाणे याचा पीक उत्पादनाला फटका बसला आहे.याचा परिणाम यंदाच्या खरीप हंगामात शेतकऱ्यांना बियाणी उपलब्ध होण्यात निर्माण होणार आहे. ही गरज लक्षात घेऊन महाराष्ट्र शासन,कृषी विभाग आणि कृषी संशोधन विभाग झुकेनी फार्मर प्रोड्यूसर कंपन्यांच्या माध्यमातून ग्रामबीजोत्पादन योजना राबविण्यात आली आहे, अशी माहिती शेगावमधील शेतकरी कौस्तुभ बांदिवडेकर यांनी दिली. वाळवा तालुक्यातील 40 गावांमध्ये हा प्रकल्प राबवण्यात आला आहे. वाळवा तालुक्यात 100 एकर क्षेत्रावर शेतकऱ्यांनी गट शेतीच्या माध्यमातून 400 क्विंटल सोयाबीन बियाण्यांची निर्मितीचं उद्दिष्ठ ठेवण्यात आलं आहे. 170 शेतकरयांनी एकत्र येऊन तालुक्यात कसबे डिग्रज कृषी संशोधन केंद्राकडून विकसित करण्यात आलेल्या सोयाबीनच्या फुले संगम (KDS 726) या वाणाचे उन्हाळी हंगामात पीक घेतले आहे.
गटशेतीद्वारे सोयाबीनच्या लागवडीचा जिल्ह्यातील पहिला प्रयोग
वाळवा तालुक्यातील शेगाव याठिकाणी सोयाबीनचा हा जिल्हातील पहिलाच प्रयोग यशस्वी करण्यात आला आहे. तर उत्तम दर्जाचे बियाण्यांची निर्मिती होण्यासाठी या सोयाबीन पिकावर ड्रोनद्वारे औषध फवारणी करण्यात आली. ज्यामुळे कमी वेळेत व कमी खर्चात शेतकऱ्यांना औषध फवारणी शक्य असल्याचं वाळवा तालुक्याचे कृषी अधिकारी भगवान माने यांनी सांगितलं. ड्रोनद्वारे औषध फवारणीचं प्रात्यक्षिकाही यावेळी कृषी विभागाच्यावतीने दाखवण्यात आलं. यावेळी कृषी अधिकाऱ्यांसह शेतकरी उपस्थित होते.
शेतकऱ्यांना बियाणांचा भेडसावणारा प्रश्न, बाजारात उपलब्ध असणारे बियाण्यांच्या बाबतीची विश्वासार्हता या सर्वांना या गट शेतीच्या माध्यमातून उत्पादित केलेले बियाणे हे उत्तम पर्याय ठरणार आहेत, असं शेतकरी ,तसेच या उत्पादित केलेल्या बियाण्यांच्या विक्रीतूनही शेतकऱ्यांना नफा मिळवता येणार आहे.

