कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी आणि नागरिकांना नियमांचं पालन करण्याचं आवाहन करण्यासाठी अन्न व नागरी पुरवठा आणि पालकमंत्री छगन भुजबळ रस्त्यावर उतरल्याचं पाहायला मिळालं.
नाशिक : नाशिक शहर आणि जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. मनपा प्रशासन आणि जिल्हाधिकाऱ्यांनी निर्बंध लागू केले आहेत. असं असलं तरीही नाशिक शहर आणि जिल्ह्यातील कोरोनास्थिती अधिक गंभीर बनत चालली आहे. अशावेळी कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी आणि नागरिकांना नियमांचं पालन करण्याचं आवाहन करण्यासाठी अन्न व नागरी पुरवठा आणि पालकमंत्री छगन भुजबळ रस्त्यावर उतरल्याचं पाहायला मिळालं. भुजबळ आज नाशिकच्या रस्त्यांवर उतरुन रिक्षाचालक, छोटे दुकानदार आणि सर्वसामान्य नागरिकांना मास्क लावण्याचं आणि नियम पाळण्याच्या सूचना करत होते.
प्रशासनाकडून नियम लावले जात आहेत. पण नागरिक ऐकत नाहीत. त्यामुळे नाशिकमधील रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. शहरातील कोरोनास्थिती पाहता नागरिकांनी नियम पाळण्याची गरज आहे. लोक सांगूनही ऐकत नसतील तर शेवटी लॉकडाऊन या शेवटच्या पर्यायाचा विचार करावा लागेल, असा इशाराही भुजबळांनी दिला आहे.
नाशिकमधील कोरोना स्थिती –
नाशिकमधील कोरोना रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. काल दिवसभरात तब्बल 2 हजार 994 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर 12 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय. काल आढळलेल्या रुग्णांपैकी महापालिका क्षेत्रात 1 हजार 739, नाशिक ग्रामीणमध्ये 1 हजार 160, मालेगाव मनपा हद्दीत 47, जिल्ह्याबाहेरील 48 रुग्णांचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 2 हजार 274 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय.
नाशिकची लॉकडाऊनच्या दिशेने वाटचाल
नाशिकची वाटचाल टाळेबंदीच्या दिशेने सुरु आहे. महापालिका आयुक्त कैलास जाधव यांनी निर्वाणीचा इशारा दिला आहे. डॉक्टरचं कोरोनाच्या विळख्यात अडकत असल्याने येणाऱ्या काळात परिस्थिती हाताबाहेर जाईल, अशी भीती आहे. बेड उपलब्ध करुन देणे अवघड नाही, मात्र आरोग्य कर्मचारीच कोरोनाच्या विळख्यात सापडले तर उपचार कोण करणार त्यामुळे नागरिकांनी काटेकोरपणे नियम पाळावे, असं आयुक्तांनी दरडावलं आहे. नागरिकांनी नियम पाळले नाहीत तर शेवटचा पर्याय म्हणून टाळेबंदी करावी लागेल, असं त्यांनी सांगितलं. काल दिवसभरात 3 हजारहून अधिक नव्या कोरोना रुग्णांची नोंद नाशिक जिल्ह्यात झाल्याने आज तातडीची बैठक घेण्यात आली. या बैठकीला महापौर सतीश कुलकर्णी,आयुक्त कैलास जाधव यांच्यासह इतर नेते बैठकीला उपस्थित होते.
आता प्रशासनाने घातलेल्या निर्बंधांवर एक नजर टाकूयात
– अत्यावश्यक सेवा वगळता इतर दुकानं,बाजारपेठा सकाळी 7 ते सायंकाळी 7 पर्यंतच सुरू राहतील..
– भाजी मार्केट 50 टक्के क्षमतेने सुरू राहील
– शाळा,कॉलेज,खाजगी क्लासेस सर्व बंद आहेत
– सर्वजनिक कार्यक्रम तसेच लग्न सोहळ्यांवर बंदी घालण्यात आली आहे
– दुकान,आस्थापना,हॉटेल नियम पाळणार नाहीत ते 1 महिना ते 6 महिन्या बंद केले जाणार आहेत.
– दर शनिवार,रविवार शहरात अंशतः लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे.

