मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कारण नसताना घराबाहेर न पडण्याचं आवाहन केलेलं असतानाही मुंबईकर राजरोसपणे घराबाहेर पडताना दिसत आहेत.
मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कारण नसताना घराबाहेर न पडण्याचं आवाहन केलेलं असतानाही मुंबईकर राजरोसपणे घराबाहेर पडताना दिसत आहेत. आज त मुंबईतील अनेक बाजारात प्रचंड गर्दी उसळली. पाय ठेवायलाही जागा नव्हती, एवढी गर्दी मुंबईतील मार्केटमध्ये ठिकठिकाणी पाहायला मिळत होती. ही गर्दी पाहता मुंबईत पुन्हा लॉकडाऊन होणार की काय? अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.
मुंबईत गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे मुंबईकरांना गर्दी न करण्याचं आवाहन करण्यात येत आहे. मात्र, मुंबईकर काही ऐकण्याच्या मनस्थितीत दिसत नाहीत. आज दादरच्या शिवाजी पार्कात आणि दादर मंडईत प्रचंड गर्दी झाली होती. लोक भाजीपाला खरेदी करण्यासाठी मोठ्या संख्येने आले होते. विशेष म्हणजे अनेकांच्या तोंडाला मास्क नव्हते. मंडईत पाय ठेवायला जागा नव्हती एवढी गर्दी मुंबईत झाली होती. त्यामुळे सोशळ डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला होता. दादरच्या मंडईत महिला आणि पुरुषही मोठ्या संख्येने होते.
लॉकडाऊन लागू होणार?
दादरच नव्हे तर मुंबईतील इतर भागातही अशीच गर्दी पाहायला मिळत आहे. दादर, माटुंगा, सायन, चेंबूर, कुर्ला, घाटकोपर, मुलुंड, भांडूप, विक्रोळी, गोवंडी आणि मानखुर्दसह मुंबईतील विविध भागातील मंडयांमध्ये अशीच गर्दी झालेली दिसून येत आहे. त्यामुळे मुंबईत पुन्हा लॉकडाऊन लागणार की काय? अशी शक्यता बळावली आहे.
मुंबईत 6 दिवसात 13 हजार रुग्ण
मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. मुंबईत गेल्या सहा दिवसात 13,912 रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे गेल्या सहा दिवसात कंटेनमेंट झोन वाढवण्यासह इमारतीही मोठ्या प्रमाणावर सील करण्यात आल्या आहेत. 13 मार्च रोजी मुंबईत 31 अॅक्टिव्ह कंटेनमेंट झोन होते. तर 220 इमारती सील करण्यात आल्या होत्या. 18 मार्च रोजी मुंबईत 34 कंटेन्मेंट झोन झाले असून 305 इमारती सील करण्यात आल्या आहेत.
मॉलमध्ये आधी चाचणी नंतर प्रवेश
मुंबईतील प्रसिद्ध पॅलेडियम, फिनिक्स, रुण्वाल, इन्फिनिटी, इनॉर्बिट यांसारख्या मोठ्या मॉलमध्ये दररोज हजारोंच्या संख्येनं लोक येत असतात. विक एन्डला तर मुंबईतील सर्व मॉलमध्ये लाखो लोकांची गर्दी होते. त्यामुळे मुंबईतील मोठ्या मॉलमध्ये प्रवेशासाठी अँटिजेन चाचणी केली जाणार आहे. ही चाचणी बंधनकारक केल्यास आपोआप गर्दीला आळा बसेल, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
मुंबईत येणाऱ्या प्रवाशांच्या चाचण्या
तसेच मुंबईतील खाऊ गल्लीचा स्टाफ आणि मुंबईतील रेस्टॉरंटच्या स्टाफची कोविड चाचणी बंधनकारक करण्यात आली आहे. तसेच मुंबईतील बाहेरगावच्या रेल्वे येणारे 7 मुख्य रेल्वे स्थानकातही प्रवाशांच्या चाचण्या केल्या जाणार आहे. यात वांद्रे, दादर, बॉम्बे सेंट्रल, सीएसएमटी, कुर्ला, अंधेरी, बोरिवली या स्थानकांचा समावेश आहे. या स्थानकांवर दर दिवसाला प्रत्येकी किमान 1 हजार प्रवाशांच्या चाचण्या होणार आहे. विशेषत: विदर्भातून येणाऱ्या प्रवाशांवर प्रशासनाचं विशेष लक्ष असणार आहे. मुंबईतील मुख्य बस स्थानक दादर, परळ येथे दररोज 1 हजार प्रवाशांच्या चाचण्या होणार आहे. मुंबईत दिवसाला 50 हजार टेस्ट करण्याचं प्रशासनाचं लक्ष आहे. सध्या मुंबईत दिवसाला 20 ते 23 हजार चाचण्या केल्या जात आहे.

