गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील नेते मंडळींच्या भेटीगाठीच्या सिलसिल्यानंतर आज पवार आणि मोदी यांच्यात झालेल्या चर्चेनंतर अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहे. त्यात काही भेटीचे संदर्भही दिले जात आहेत.
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची आज दिल्लीत महत्वाची बैठक पार पडली. यावेळी पवार आणि मोदी यांच्याच जवळपास तासभर चर्चा झाल्याची माहिती मिळतेय. या भेटीत बँकिंग क्षेत्राचे प्रश्न, नव्याने निर्माण करण्यात आलेल्या सहकार खात्याबाबत चर्चा झाल्याचं राष्ट्रवादी काँग्रेस आणि महाविकास आघाडीतील अन्य घटकपक्ष असलेल्या शिवसेना आणि काँग्रेसच्या नेत्यांकडून सांगण्यात येत आहे. दुसरीकडे गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील नेते मंडळींच्या भेटीगाठीच्या सिलसिल्यानंतर आज पवार आणि मोदी यांच्यात झालेल्या चर्चेनंतर अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहे. त्यात काही भेटीचे संदर्भही दिले जात आहेत.
15 जुलै – फडणवीस-भुजबळ भेट
15 जुलै रोजी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांची मुंबईत भेट झाली होती. छगन भुजबळ हे पुतणे आणि माजी खासदार समीर भुजबळ यांच्यासह फडणवीसांच्या सागर या बंगल्यावर दाखल झाले. यावेळी ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर चर्चा झाल्याचं दोन्ही नेत्यांकडून सांगण्यात आलं. “राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ हे ओबीसी आरक्षणाप्रश्नी मला भेटले. मी त्यांना पुढाकार घेण्यास सांगितलं, आवश्यक ती सर्व मदत करेनच, शिवाय मी पर्सनली नोट तयार करुन देईन”, असं देवेंद्र फडणवीस या भेटीनंतर म्हणाले होते. मात्र, या भेटीत छगन भुजबळ हे एखादा निरोप घेऊन देवेंद्र फडणवीस यांना भेटले, अशी शंका उपस्थित केली जात आहे.
16 जुलै – फडणवीस दिल्लीला रवाना
15 जुलै रोजी भुजबळ यांच्यासोबत बैठक झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी देवेंद्र फडणवीस राजधानी दिल्लीला रवाना झाले. या दौऱ्यात त्यांनी नवनिर्वाचित केंद्रीय मंत्री नारायण राणे, केंद्रीय राज्यमंत्री कपील पाटील आदींची भेट घेतली. इतकंच नाही तर नव्याने निर्माण झालेल्या सहकार खात्याचे मंत्री अमित शाह यांचीही फडणवीसांनी भेट घेतली. अमित शाह यांच्यासोबत झालेल्या बैठकीत फडणवीसांनी भुजबळांनी दिलेला निरोप सांगितला, अशी चर्चा आता होऊ लागली आहे.
17 जुलै – पंतप्रधान मोदी, शरद पवार भेट
आज पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शरद पवार यांच्यात दिल्लीमध्ये जवळपास तासभर चर्चा झाली. या बैठकीत सहकार, बँकिंग क्षेत्राचे प्रश्न अशा विषयांवर चर्चा झाल्याचं महाविकास आघाडीतील नेत्यांकडून सांगितलं जात आहे. तर दुसरीकडे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर हे पवार आणि मोदी यांच्या बैठकीत फक्त हवापाण्याच्या चर्चा तर झाल्या नसतील, असं वक्तव्य केलं आहे. त्यामुळे आगामी काळात राज्यात सत्ताबदल्याच्या चर्चा आता पुन्हा एकदा सुरु झाल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप नेत्यांच्या भेटीगाठी वाढल्यामुळे शिवसेनेला चेकमेट तर होणार नाही ना? असा प्रश्नही आता सर्वसामान्य जनतेकडून विचारला जात आहे

