जनता मोदी आणि भाजपवर उघडपणे बोलत असल्याने केंद्र सरकारच्या ट्विटरवर कारवाईच्या हालचाली; नवाब मलिकांचा आरोप

0 झुंजार झेप न्युज

देशातील नागरिक मोदी आणि भाजपवर उघडपणे बोलत असल्यानेच केंद्र सरकार ट्विटरवर कारवाई करण्याच्या प्रयत्नात असल्याचा आरोप नवाब मलिक यांनी केला आहे.

मुंबई : जगभरात आणि देशभरात ट्विटरच्या माध्यमातून केंद्र सरकार, नरेंद्र मोदी आणि भाजपवर लोक उघडपणे बोलत आहेत, ते कसं थांबवावं यासाठी केंद्र सरकारच्या ट्विटरवर कारवाई करण्याच्या हालचाली सुरू असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केला आहे.

कुठल्याही देशात त्यांच्या कायद्यांतर्गत कुठलीही यंत्रणा असेल किंवा आस्थापना असेल त्यांच्यावर नियंत्रण करणं किंवा कारवाई करणं हा अधिकार असतो. परंतु केंद्र सरकार ट्वीटरसोबत का भांडतंय? हा प्रश्न आहे असेही नवाब मलिक म्हणाले.

लोकांना स्पष्टपणे मत मांडायला ट्विटरसारखा प्लॅटफॉर्म मिळाला आहे. त्यामुळे लोकांच्या बोलण्याच्या अधिकारावर गदा आणणं हे योग्य ठरणार नाही, असेही मत नवाब मलिक यांनी व्यक्त केले आहे.

खडसेंविरुद्धची कारवाई सूडबुद्धीने : मलिक

ईडीच्या माध्यमातून सुडबुद्धीने व राजकीय हेतूने एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांची चौकशी सुरु आहे. एकनाथ खडसे हे या चौकशांना सामोरे जाताना यंत्रणेला सहकार्य करत आहेत. त्यांनी काही केलं नाही त्यामुळे ते घाबरत नाहीत, असं राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री नवाब मलिक म्हणाले. यंत्रणांच्या माध्यमातून लोकांवर दबाव निर्माण करुन राजकीय गणितं बदलतील तर तो भाजपचा गैरसमज आहे, अशी टीकाही त्यांनी भाजपवर केली आहे.

फडणवीसांनी खडसेंचं खच्चीकरण केलं

ज्या प्रकरणात ईडी एकनाथ खडसे यांची चौकशी करत आहे त्याचाच आधार घेऊन देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ खडसे यांचं खच्चीकरण केले होते. त्या प्रकरणाची न्यायालयीन चौकशीही झाली. आता ईडीच्या माध्यमातून सुडबुद्धीने व राजकीय हेतूने चौकशी सुरू असल्याचा आरोप मलिक यांनी केला आहे.

कुणीही या यंत्रणांना घाबरत नाही

भाजपला वाटत असेल की, या यंत्रणांच्या माध्यमातून लोकांवर दबाव निर्माण करुन राजकीय गणितं बदलतील तर तो भाजपचा गैरसमज आहे. कुणीही या यंत्रणेला घाबरत नाही, असा इशाराही नवाब मलिक यांनी दिला आहे.

खडसेंचं ईडीला सहकार्य, ते घाबरत नाही

ईडी किंवा इतर यंत्रणेमार्फत कितीही चौकशा लावल्या तरी सत्य आज ना उद्या समोर येणार आहेच. एकनाथ खडसे हे या चौकशांना सामोरे जाताना यंत्रणेला सहकार्य करत आहेत. त्यांनी काही केलं नाही त्यामुळे ते घाबरत नाहीत, असं मलिक म्हणाले.

यंत्रणांचा दुरुपयोग करणं हे भाजपचं काम

यंत्रणांचा दुरुपयोग करणं हे भाजपचं काम आहे. निव्वळ महाराष्ट्रच नव्हे तर पश्चिम बंगाल, युपी असतील तिथे विरोधकांना त्यांच्या मनात भीती निर्माण करण्याचं काम या यंत्रणांच्या माध्यमातून होत आहे असंही नवाब मलिक म्हणाले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.