हिवाळी अधिवेशनातील पुरवणी मागण्यांमध्ये जालना जिल्ह्याची 206 कोटींची विकास कामे मंजूर पालकमंत्री राजेश टोपे यांच्या पाठपुराव्याला यश
जालना,दि.23: मुंबई येथे सुरू असलेल्या विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनामध्ये जालना जिल्ह्यातील विकास कामांकरिता सन २०२१-२२ च्या पुरवणी मागण्यांमध्ये सुमारे २०६.६३ कोटी रुपयांची कामे मंजूर करण्यात आली आहेत. त्यामध्ये महसूल, कृषी, सार्वजनिक बांधकाम, आरोग्य आदी विभागांचा समावेश असल्याचे जिल्ह्याचे पालकमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.
जालना जिल्ह्यातील विविध विकासकामांसाठी निधी उपलब्ध करून देण्याबाबत पालकमंत्री श्री. टोपे यांनी उपमुख्यमंत्री तथा वित्त मंत्री अजित पवार यांच्याकडे पाठपुरवा केला होता. त्याला यश मिळाल्याने जिल्ह्यातील विकासकामांना वेग येईल, असे सांगतानाच निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल मंत्री श्री. टोपे यांनी उपमुख्यमंत्र्यांचे जालना जिल्हावासियांच्यावतीने आभार मानले.
पुरवणी मागण्यांमध्ये अंबड जि. जालना येथे महसूल अधिकारी व कर्मचारी यांच्याकरिता निवासस्थान बांधकाम करण्यासाठी ११ कोटी ३४ लाख, जालना जिल्हाधिकारी कार्यालय, उपविभागीय कार्यालय, जालना येथील कार्यालयांतर्गत सजावट व फर्निचर कामांसाठी २ कोटी ३३ लाख, अंबड जि. जालना येथे ४४ तलाठी कार्यालय बांधकाम करण्यासाठी ११ कोटी ४६ लाख, जालना येथे कृषी भवन इमारतीचे बांधकामासाठी १४ कोटी ३५ लाख, घनसावंगी जि. जालना येथील विश्रामगृहाचे नूतनीकरण व विस्तारीकरणासाठी १ कोटी ३४ लाख, अंबड जि. जालना येथे ५० खाटांचे उपजिल्हा रुग्णालयाचे श्रेणीवर्धन करुन १०० खाटांचे उपजिल्हा रुग्णालय, निवासस्थान बांधकामासाठी ४२ कोटी ३५ लाख, घनसावंगी जि. जालना येथे ३० खाटांचे ग्रामीण रुग्णालयाचे श्रेणीवर्धन करुन १०० खाटांचे उपजिल्हा रुग्णालय व निवासस्थान बांधकामासाठी ४२ कोटी ३५ लाख, जिल्हा रुग्णालय जालना येथील दुरुस्ती (सुप्रमा) करिता २२ कोटी १४ लाख, जालना येथील ३६५ खाटांचे प्रादेशिक मनोरुग्णालयाच्या इमारतीच्या बांधकामासाठी ५८ कोटी ९४ लाख अशा एकूण २०६ कोटी ६३ लाख रुपयांचे कामे मंजूर करण्यात आली आहेत.
जिल्ह्याच्या महसुल, कृषी आणि आरोग्य या विभागांची महत्वाची विकासकामे होणार असल्याने नागरिकांना त्याचा लाभ होणार आहे. उपजिल्हा आणि ग्रामीण रुग्णालयांचे श्रेणीवर्धन होणार असल्याने नागरिकांना दर्जेदार आरोग्य सेवा मिळण्यास मदत होणार आहे.
