26 तांडा वस्त्यांच्या पाणी पुरवठा योजनांना मंजुरी उर्वरित कामे 31 मार्च पूर्वी पूर्ण करा- जिल्हाधिकारी
यवतमाळ,दि.20: प्रत्येक घरी स्वच्छ व शुद्ध पिण्याचे पाणी उलब्ध करून देण्यासाठी जल जीवन मिशन राबविण्यात येत आहे. जिल्ह्यात 183 गावांमध्ये पाणी पुरवठा योजना नाही. या सर्व गावात घरोघरी नळ जोडणी देण्यासाठी तेथील स्थानिक परिस्थितीचा विचार करून व्यवहार्य अशा योजनांचे प्रस्ताव 31 मार्च पर्यंत तयार करून त्या कामांचे कार्यादेश निघतील या पद्धतीने नियोजन करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिलेत. तसेच लहान तांडे वस्त्या जिथे मोठ्या पाणी पुरवठा योजना अव्यवहार्य ठरतात अशा 26 वस्त्यांना सौर ऊर्जेवर आधारित पाणी पुरवठा योजनांच्या प्रस्तावांना आज जिल्हाधिकारी यांनी मंजुरी दिली.
जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल भवन येथे जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन अंतर्गत आयोजित बैठकीला जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, जिल्हा प्रकल्प संचालक मनोज चौधर, पाणी पुरवठा कार्यकारी अभियंता प्रदीप कोल्हे उपस्थित होते.
यावेळी पाणी आणि ऊर्जा सल्लागार सेवा या एजन्सीने दर आठवड्याला नियोजन करून डी.पी.आर. सादर करावा. तसेच दर आठवड्याला सादर करण्यात आलेल्या अचूक प्रस्तावांना विना विलंब प्रशासकीय मान्यता देण्यात येईल असे श्री येडगे यांनी सांगितले.
