जालन्यात कामगारांसाठी ईएसआयसीचे 100 खाटांचे रुग्णालय उभारण्यासाठी सर्व लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांनी टीमवर्कने काम करावे-पालकमंत्री राजेश टोपे यांचे आवाहन.
जालना,दि.14: जालना शहर हे औद्योगिक शहर म्हणून ओळखले जाते. जिल्ह्यात मोठया औद्योगिक वसाहतीबरोबरच अनेक आस्थापनाही आहेत, ज्या ठिकाणी हजारो कामगार काम करतात. या कामगारांसाठी जालन्यामध्ये कर्मचारी राज्य बिमा निगम (ईएसआयसी) चे 100 खाटांची क्षमता असलेले मोठे रुग्णालय उभारण्याचा मानस आहे. त्यासाठी 50 हजार कामगारांची ईएसआयसीमध्ये नोंदणी करून गरीब कामगारांचे हित जपण्यासाठी सर्व लोकप्रतिनिधीसह अधिकाऱ्यांनी टीमवर्कने काम करण्याचे आवाहन राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटूंब कल्याण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राजेश टोपे यांनी केले.
जालना शहरातील शनि मंदिराजवळ कर्मचारी राज्य बीमा निगमच्या औषधालय व शाखा कार्यालयाचा शुभारंभ पालकमंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते करण्यात आला. त्याप्रसंगी उपस्थितांशी संवाद साधताना ते बोलत होते.
यावेळी आमदार कैलास गोरंटयाल, आरोग्य विभागाच्या प्रधान सचिव डॉ. नीलिमा केरकट्टा, जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड,जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अर्चना भोसले, ईएसआयसीचे उपसंचालक चंद्रभान झा, संजीव यादव आदींची प्रमुख उपस्थिती होती.
पालकमंत्री राजेश टोपे म्हणाले, केंद्र शासनाच्या अखत्यारित असेलेले कर्मचारी राज्य बिमा निगम ईएसआयसी हे कामगारांना विविध सेवा-सुविधा देण्याचे काम करते. ज्या जिल्ह्यामध्ये 20 हजारापेक्षा अधिक कामगारांनी ईएसआयसीमध्ये नोंदणी केलेली आहे अशा ठिकाणी या कामगारांसाठी 30 खाटांचे तर 50 हजार कामगारांची नोंदणी असलेल्या ठिकाणी 100 खाटांचे सर्व सुविधांनीयुक्त असे रुग्णालय उभारण्यात येते. जालना जिल्ह्यात मोठी औद्योगिक वसाहत असण्याबरोबर जिल्ह्याच्या आठही तालुक्यात 10 पेक्षा अधिक कामगार काम करत असलेल्या अनेक आस्थापना आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत 13 हजार कामगारांची ईएसआयसीमध्ये नोंदणी करण्यात आली असल्याने सर्वांच्या सहकार्यामुळे याठिकाणी औषधालय व शाखा कार्यालयाचा शुभारंभ करण्यात आला असून याचा लाभ कामगारांना होणार असल्याने याचा मनस्वी आनंद होत असल्याचेही पालकमंत्री श्री टोपे यांनी यावेळी सांगितले.
ईएसआयसीच्या रुग्णालयातुन कामगारांना कॅशलेस पद्धतीने अत्यंत चांगल्या पद्धतीने उपचार दिले जातात. या रुग्णालयातुन उपचार घेत असताना वैद्यकीय खर्चाची कुठलीही मर्यादा नसल्याने मोठमोठ्या आजारावरदेखील या ठिकाणी उपचार देण्यात येतात. ईएसआयसीमध्ये नोंदणी करणाऱ्या कामगारांना वैद्यकीय सेवा देण्याबरोबरच अपघातामध्ये जर कामगाराचा मृत्यु झाला तर अशा कामगारांच्या कुटूंबियांना निवृत्तीवेतन देण्याबरोबरच इतरही सुविधा ईएसआयसीमार्फत देण्यात येतात. राज्य शासनाकडून दरवर्षी केंद्र शासनाकडे जवळपास साडेतीन हजार कोटी रुपये जमा करण्यात येतात. त्याप्रमाणात केवळ 300 कोटी रुपयांचा लाभ राज्य शासनामार्फत ईएसआयसीच्या माध्यमातुन घेण्यात येतो. ईएसआयसीकडे मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध असुन कामगार बांधवांना आरोग्याच्या सेवेबरोबरच ईतर सेवा-सुविधांचा लाभ मिळण्यासाठी, या कामगारांना आधार देण्यासाठी प्रशासनातील अधिकारी तसेच आस्थापनांच्या मालकांनी सामाजिक बांधिलकी जपत या रुग्णालयाच्या उभारणीसाठी हिरिरीने यामध्ये सहभाग नोंदवत अधिकाधिक कामगारांची नोंदणी करण्याचे आवाहनही पालकमंत्री श्री टोपे यांनी यावेळी केले.
आमदार कैलास गोरंट्याल म्हणाले, ईएसआयसीची केंद्र शासनाची योजनेचा लाभ केवळ पालकमंत्री राजेश टोपे यांच्या पुढाकारामुळेच कामगार बांधवांना होणार असुन येणाऱ्या काळात जालन्यामध्ये ईएसआयसीचे मोठे रुग्णालय उभारण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याची अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.
आरोग्य विभागाच्या प्रधान सचिव डॉ. निलिमा केरकट्टा म्हणाल्या, जालना जिल्ह्याच्या विकासासाठी पालकमंत्री राजेश टोपे हे सातत्याने आग्रही असल्याचा अनुभव आपल्याला सातत्याने येतो. त्यांच्याच पुढाकारातुन आज जालन्यामध्ये ईएसआयीचे औषधालय व शाखा कार्यालयाचा शुभारंभ होत आहे. राज्य शासनाच्या महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेतुन उपचार घेत असताना उपचाराच्या खर्चाची मर्यादा आहे. परंतु ईएसआयसीच्या रुग्णालयातून कामगारांना उपचार घेण्यासाठी खर्चाची कुठलीही मर्यादा नसुन या माध्यमातुन आरोग्याच्या सेवा मोफत मिळण्याबरोबरच ईतरही सुविधांचा लाभ मोठ्या प्रमाणात देण्यात येतो. त्यामुळे जालन्यात 100 खाटांच्या रुग्णलयाच्या उभारणीसाठी कामगारांच्या नोंदणीसाठी प्रशासनाने पुढाकार घेण्याच्या सुचनाही त्यांनी यावेळी केल्या.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात उपसंचालक चंद्रभान झा यांनी ईएसआयसीमार्फत देण्यात येत असलेल्या सुविधांची माहिती दिली. सर्वप्रथम पालकमंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते राज्य बीमा निगमच्या औषधालय व शाखा कार्यालयाचा फित कापुन शुभारंभ करण्यात आला. कार्यक्रमास पदाधिकारी, अधिकारी यांच्यासह नागरिकांची उपस्थिती होती.
