ग्रामीण व शहरी भागात जलसंधारणाची कामे मोठया प्रमाणात करण्यात यावी-षण्मुगराजन एस.

0 झुंजार झेप न्युज

‘कॅच द रेन’ मोहिमेच्या कामाचा आढावा

वाशिम,दि.04: पावसाच्या पाण्याचा प्रत्येक थेंब अडवून तो जमीनीत जिरविणे काळाची गरज आहे. ग्रामीण आणि शहरी भागात या पावसाळयात वृक्ष लागवडीची कामे, रेन वॉटर हार्वेस्टिंग, शोषखड्डयांची तसेच बोअरवेल दुरुस्तीच्या कामातून जलसंधारणाची कामे मोठया प्रमाणात करण्यात यावी. असे निर्देश जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी दिले.आज 4 जुलै रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील वाकाटक सभागृहात जलशक्ती अभियानाअंतर्गत कॅच द रेन मोहिमेचा आढावा आयोजित सभा घेतांना श्री. षण्मुगराजन बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेच्या  मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत, जिल्हा जलसंधारण अधिकारी सुभाष आकोसकर, जिल्हा परिषदेचे जलसंधारण अधिकारी लक्ष्मण मापारी, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार, भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेचे वरिष्ठ भूवैज्ञानिक श्री. कडू, जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता श्री. वानखेडे, सहायक वनसंरक्षक श्री. राठोड यांची प्रमुख उपस्थिती होती.

श्री.षण्मुगराजन म्हणाले, काही गावाजवळ असलेल्या तलावातील गाळ ग्रामस्थांच्या सहभागातून काढून पाणीसाठा वाढविण्यासाठी प्रयत्न करावा. प्रत्येक पंचायत समितीने ग्रामपंचायत अंतर्गत 50 हजार ते 1 लक्ष वृक्ष लागवडीचे नियोजन करावे. खाजगी इमारतीला बांधकामाची परवानगी देतांना रेन वॉटर हार्वेस्टिंगचे काम करणे बंधनकारक करावे. विहीर पुनर्भरणाची कामे तसेच नादुरुस्त असलेल्या बोअरवेल दुरुस्तीची कामे मोठया प्रमाणात करण्यात यावी. रेन वॉटर हार्वेस्टिंगची कामे कमीत कमी खर्चात करण्यात यावी. प्रत्येक ग्रामसेवकाला खाजगी इमारतीवर रेन वॉटर हार्वेस्टिंगच्या दोन कामाचे उद्दिष्ट देण्यात यावे. ज्या गावामध्ये शासकीय कर्मचाऱ्यांची घरे आहेत त्यांच्या इमारतीवर रेन वॉटर हार्वेस्टिंगची कामे करण्यात यावी. असे त्यांनी सांगितले.

सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापनाची कामे देखील ग्रामीण भागात मोठया प्रमाणात हाती घ्यावी. असे सांगून श्री. षण्मुगराजन म्हणाले, वृक्ष लागवडीचे नियोजन करतांना खड्डे तयार करण्याची पुर्वतयारी करण्यात यावी. जलसंधारणाची ही सर्व कामे सप्टेंबर 2022 पूर्वी पुर्ण करण्यात यावी. जी कामे झाली आहे ती सर्व कामे संकेतस्थळावर अपलोड करण्यात यावी. ज्या विभागांनी अद्यापही कॅच द रेन मोहिमेअंतर्गत आराखडा सादर केलेला नाही त्यांनी आराखडा तात्काळ सादर करावा. असे ते यावेळी म्हणाले.

श्रीमती पंत म्हणाल्या, मनरेगा योजनेतून प्रत्येक गावामध्ये 10 शोषखड्डयांची कामे करण्यात यावी. प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये वृक्ष लागवडीचे पूर्व नियोजन करण्यात आले आहे. जिल्हयात नव्याने बांधण्यात येणाऱ्या अंगणवाडी, प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्राच्या इमारतीवर रेन वॉटर हार्वेस्टिंगची कामे करण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

जलसंधारणाची विविध विभागाची 4322 कामे पुर्ण झाल्याची माहिती श्री. आकोसकर यांनी दिली. कृषी विभाग, नगरविकास विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, मृद व जलसंधारण विभाग, वन विभाग आणि पंचायत समितीअंतर्गत करण्यात आलेल्या जलसंधारण कामांची आणि करण्यात येणाऱ्या कामांची माहिती यावेळी संबंधित अधिकाऱ्यांनी दिली. या सभेला सर्व नगर पालीका व नगरपंचायतचे मुख्याधिकारी, पंचायत समितीचे गट विकास अधिकारी, तालुका कृषी अधिकारी आणि जलसंधारण विभागाचे उपविभागीय अभियंते उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.