जिल्हा विकास आराखड्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले कौतुक

0 झुंजार झेप न्युज

• पर्यटन विकासातून रोजगार वृद्धीसाठी सर्वतोपरी मदत करण्याची मुख्यमंत्री यांची ग्वाही 

सातारा दि.14: जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी पालकमंत्री शंभूराजे देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी अत्यंत चांगला विकास आराखडा सादर केला आहे असे सांगून जिल्ह्यातील पर्यटन क्षमता वृद्धिंगत करून त्याद्वारे रोजगार निर्मितीसाठी शासन सर्वतोपरी मदत करील, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.सातारा जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी तयार करण्यात आलेल्या आराखड्याचे सादरीकरण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी केले. यावेळी पालकमंत्री शंभूराज देसाई यांची प्रमुख उपस्थिती होती.

सातारा जिल्हा हा अत्यंत वैविध्यपूर्ण निसर्ग संपदा लाभलेला संपन्न जिल्हा आहे. या जिल्ह्याला 110 किलोमीटरचा कोयनेचा बॅकवॉटरचा पट्टा लाभला आहे. या जिल्ह्यात जंगले आहेत, प्राणी आणि पक्षी अभयारण्य आहेत, मंदिरे, गड, किल्ले, धबधबे, पठारे आहेत. अशा स्थितीत पर्यटनाचा विकास झाल्यास जिल्ह्यातून नोकरी धंद्यासाठी बाहेरगावी जाणारा युवकाला आपल्याच मायभूमीत रोजगार उत्पन्न होईल या दृष्टीने जिल्ह्यातील पर्यटन वृद्धीच्या क्षमता ओळखून अत्यंत चांगला आराखडा जिल्हा प्रशासनाने तयार केला आहे. जिल्ह्यातील तरुणांना आपल्याच गावात राहून रोजगार उपलब्ध व्हावा त्याला इतर शहरांमध्ये रोजगारासाठी जायला लागू नये. किंबहुना रोजगारानिमित्त इतर शहरात गेलेले तरुण पुन्हा आपल्या मायभूमीत परत यावेत, या उद्देशाने जिल्ह्याच्या पर्यटन विकासासाठी आवश्यक ती सर्व मदत शासनाच्या माध्यमातून दिली जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

जिल्ह्याच्या पर्यटन विकासासाठी मोठ्या प्रमाणावर रस्त्यांचे जाळे वाढवत आहोत. असे सांगून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, अनेक वर्षापासून रखडलेल्या तापोळा पुलाचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. बामणोली ते दरे आणि आपटी ते तापोळा अशा दोन पुलांच्या कामांना मंजुरी देण्यात आली आहे. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र जोडण्यासाठी हे पूल अत्यंत महत्त्वाचे ठरतील आणि याचा फायदा पर्यटन वाढीलाही होईल. महाबळेश्वर तापोळा रस्त्याचे रुंदीकरण आणि मजबुतीकरण सुरू आहे मुनावळे येथे पर्यटकांसाठी आकर्षण स्थळे विकसित करण्यासाठी निधी देण्यात आला आहे. रोजगारासाठी युवकांना उद्युक्त करण्यासाठी जिल्हा प्रशासन व शासन प्रयत्नशील आहे.असेही ते यावेळी म्हणाले.

यावेळी त्यांनी जिल्ह्यात बांबू लागवड उपक्रम मिशन मोडवर हाती घेण्यात आला असून याचा शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी फायदा होईल यामध्ये अधिकाधिक शेतकऱ्यांनी बांबू लागवडीसाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहनही केले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.