मुंबई : मुंबईसह राज्यात गुरुवारपासून थंडीचा जोर वाढला आहे . मुंबईत शुक्रवारी सकाळी 12.3 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. तर नाशिकच्या निफाडमध्ये या मोसमातील सर्वात कमी तापमानाची नोंद झाली आहे. निफाडचे तापमान 2.4 अंश सेल्सिअसवर पोहोचले आहे. निफाडमधील कुंडेवाडीच्या हवामान विभागात ही नोंद करण्यात आली आहे.
मुंबईत इतर शहरांच्या तुलनेत कमी थंडी पडते. त्यामुळे मुंबईकरांना गुलाबी थंडीची हौस वाटते. बऱ्याच मुंबईकरांना हवीशी वाटणारी ही थंडी गेल्या दोन दिवसांपासून मुंबईत दाखल झाली आहे. काल (16 जानेवारी) मुंबईचे कमाल तापमान 25 अंश सेल्सिअसवर पोहोचले. हा पारा शुक्रवारी सकाळी 12.3 अंश सेल्सिअसवर पोहोचला. आज या मोसमातील सर्वाधिक थंडीची नोंद झाली आहे.
थंडी वाढल्यामुळे मुंबईकरांना आता स्वेटर घालून ऑफिसला जावं लागणार आहे. मुंबईत गुरुवारी दुपारच्या वेळी हवेचा पारा हा 25 अंश सेल्सिअर होता. त्यामुळे सकाळपासून सुरु असलेला गारवा दुपारी देखील जाणवत होता. दरम्यान, मुंबईच्या हवामाणातील गारठा आणखी वाढणार असल्याचा इशारा हवानान विभागाने दिला आहे. पुढचे दोन ते तीन दिवस हवेतील गारवा कायम असणार आहे.
उत्तरी भागातून वाहणाऱ्या थंड वारे आणि कोरडे वातावरण यामुळे मुंबईसह राज्यात कमालीची थंडी वाढली आहे. मुंबईसह कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातही थंडी सुरु झाली आहे. संपूर्ण राज्यभरात हवेत गारठा आहे. राज्यात नाशिकमध्ये सर्वाधिक थंडी पडली आहे. त्यापाठोपाठ महाबळेश्वर येथे थंडीचा कडाका सुरु आहे.
राज्यातील औरंगाबादमध्ये 15.5 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. नांदेडमध्ये 14.0 अंश सेल्सिअस तर अहमदनगरमध्ये 11 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.

