संसदेवरील हल्ल्याला 19 वर्षे पूर्ण; पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून शहीदांना श्रद्धांजली
संसदेवर 13 डिसेंबर 2001 रोजी जैश-ए-मोहम्मदच्या पाच दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. या हल्ल्याला आज 19 वर्षे पूर्ण होत आहेत. पंतप्रधान मोदींनी या हल्ल्यातील शहीदांच्या बलिदानाचे स्मरण करताना त्यांना श्रध्दांजली वाहिली.
संसदेवरील दहशतवादी हल्ल्याला आज 19 वर्षे पूर्ण झाली आहेत. या हल्ल्यातील शहीदांच्या शौर्य आणि बलिदानाचे स्मरण करताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांना श्रध्दांजली वाहिली. सोशल मीडियाच्या माध्यमातून दिलेल्या संदेशात मोदींनी म्हटलंय की, "या भ्याड हल्ल्याला आम्ही कधीही विसरणार नाही. या हल्ल्यात संसदेचं रक्षण करताना शहीद झालेल्या लोकांचं आम्ही स्मरण करतो. भारत नेहमीच त्यांचा ऋणी राहील."
आजपासून 19 वर्षापूर्वी, 13 डिसेंबर 2001 रोजी जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या पाच दहशतवाद्यांनी भारताच्या संसदेवर भ्याड हल्ला केला होता. भारतीय सुरक्षा दलांनी या हल्ल्याला प्रत्युत्तर देताना सर्व दहशतवाद्यांना मारलं होतं. या हल्ल्यात दिल्ली पोलीसांचे पाच जवान, सीआरपीएफची एक महिला कॉन्स्टेबल आणि संसदेचे दोन गार्ड शहीद झाले होते.
हल्ल्यावेळी संसदेत पंतप्रधान
दहशतवाद्यांनी संसदेवर केलेल्या या हल्ल्यावेळी संसदेत तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी आणि विरोधी पक्ष नेत्या सोनिया गांधी यांच्यासह अनेक खासदार उपस्थित होते. त्यावेळी संसदेचं हिवाळी अधिवेश सुरु होतं. संसदेवर हल्ला करणारे दहशतवादी पांढऱ्या रंगाच्या अॅंम्बेसिडरमधून आले होते. त्यांनी संसदेच्या आवारातील सुरक्षा दलांवर अचानक फायरिंग सुरु केली. त्यानंतर झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांनी त्या पाचही दहशतवाद्यांना ठार केलं.
या हल्ल्याचा मुख्य आरोपी अफजल गुरु याला दिल्ली पोलीसांनी नंतर अटक केली. अफजल गुरुला या गुन्ह्याबद्दल फाशीची शिक्षा झाली. या शिक्षेची अंमलबजावणी 9 फेब्रुवारी 2013 रोजी सकाळी दिल्लीच्या तिहार जेलमध्ये करलण्यात आली.

