मंत्री रावसाहेब दानवे यांच्या वक्तव्यावरुन महाराष्ट्रात वातावरण तापलं, राज्यात अनेक ठिकाणी आंदोलने

0 झुंजार झेप न्युज

मंत्री रावसाहेब दानवे यांच्या वक्तव्यावरुन महाराष्ट्रात वातावरण तापलं, राज्यात अनेक ठिकाणी आंदोलने

शेतकरी आंदोलनात चीन आणि पाकिस्तानचा हात असल्याचं वादग्रस्त वक्तव्य केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केलं आहे.

यावरुन महाराष्ट्रात वातावरण तापलं असून राज्यात आज अनेक ठिकाणी आंदोलने झाली.

मुंबई : भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी दिल्लीत सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाबाबत चार दिवसांपूर्वी वादग्रस्त वक्यव्य केलं आहे. शेतकरी आंदोलनात चीन आणि पाकिस्तानचा हात असल्याची अजब माहिती रावसाहेब दानवे यांनी दिली. यावरुन आता महाराष्ट्रात राजकारण तापलं असून दानवे यांच्याविरोधात जोरदार आंदोलन सुरु आहेत.

काय म्हणाले दानवे?
जालना जिल्ह्यातील कोलते टाकली येथे प्राथमिक आरोग्य केंद्राचे उद्घाटन दानवे यांच्या हस्ते झाले यावेळी ते बोलत होते. हे आंदोलन सुटा बुटातल्या लोकांचे असून शेतकरी आंदोलनात चीन आणि पाकिस्तानचा हात असल्याची अजब माहिती रावसाहेब दानवे यांनी दिली. याच देशांनी CAA च्या नावाखाली मुस्लिम समाजाला उचकवलं असून भारतातील शेतकऱ्यांनी याचा विचार करण्याचे आवाहन देखील दानवे यांनी शेतकऱ्यांना केलं आहे.


रावसाहेब दानवे यांच्या या वक्तव्यविरोधात राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये आंदोलन करण्यात येत आहे. पिंपरी चिचवड, औरंगाबाद, अकोला, यवतमाळ, चंद्रपूर, सोलापूर अशा अनेक जिल्ह्यात दानवे यांच्या विरोधात निदर्शने करण्यात आली.


राज्यात कुठे झाली आंदोलनं?


अकोला, तेल्हारा आणि अकोटमध्ये शिवसैनिकांनी रावसाहेब दानवे यांच्या वादग्रस्त वक्तव्याविरोधात आंदोलन करत गाढवाला दानवे यांची प्रतिमा बांधत निषेध केला आहे.


भिवंडी बायपास येथे शिवसेना भिवंडी नेते करसन ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली इंधन दरवाढ आणि रावसाहेब दानवे यांनी शेतकरी आंदोलनाबद्दल चुकीच्या वक्तव्य बद्दल निषेध मोर्चा करण्यात आला.


यवतमाळच्या दत्त चौकात शिवसेनेकडून केंद्र सरकारचा निषेध आंदोलन करण्यात आले. यावेळी रावसाहेब दानवे यांच्या फोटोला चपला मारुन दानवे यांचा निषेध करण्यात आला आहे.


रावसाहेब दानवे यांना काळे फासल्याशिवाय स्वस्त बसणार नाही : शिवसेना नेते अर्जुन खोतकर
शेतकरी आंदोलनाचा संबंध चीन पाकिस्तानशी जोडणाऱ्या केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या विरोधात शेतकरी संघटना आक्रमक झाल्या आहेत. आज शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांनी आंदोलना दरम्यान दानवे यांच्या वक्तव्याचा खरपूस समाचार घेतला. दानवे हे पागल झाले असून त्यांना आता वेड्याचे झटके येत असल्याने त्यांची वैद्यकीय तपासणी करणे गरजेचे असल्याचे सांगत, दानवे यांच्या तोंडाला काळे फासण्याचा इशारा दिला आहे. जालना जिल्ह्यातील बदनापूर येथे पट्रोल डिझेल दरवाढीच्या निषेधार्थ खोतकर यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते.


मंत्री रावसाहेब दानवे यांच्या वक्तव्याचा निषेध म्हणून लातूर शहरात रावसाहेब दानवे यांच्या प्रतिकात्मक पुतळ्यास जोडे मारुन दहन केले. तसेच केंद्र सरकार सत्तेवर आल्यापासून वरचेवर गॅस, डिझेल, पेट्रोल दरवाढ केल्यामुळे शेतकरी, व्यापारी, सामान्य वाहनधारक त्रस्त झाले आहेत. केंद्र सरकार विरोधात घोषणा देत यावेळी निषेध व्यक्त करण्यात आला.


केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचे पडसाद पिंपरी चिंचवडमध्ये ही उमटले. शिवसेनेने दानवे यांच्या फोटोला जोडे मारो आंदोलन केले. शेतकऱ्यांना उद्देशून दानवे नेहमीच अवमानकारक भाष्य करत असतात. म्हणूनच त्यांना मंत्री पदावरून पायउतार करावे, अन्यथा शेतकरी भाजपला योग्य तो धडा शिकवतील, असा इशारा शिवसेनेने दिला.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.