ठाकरे सरकारचेही तेच झाले; नितेश राणेंचा कांजूरमार्ग कारशेडवरून टोला
कांजूरमार्ग कारशेड प्रकरणावरून भाजपचे आमदार नितेश राणे यांनी ठाकरे सरकारवर जोरदार टीका केली.
मुंबई: कांजूरमार्ग कारशेड प्रकरणावरून भाजपचे आमदार नितेश राणे यांनी ठाकरे सरकारवर जोरदार टीका केली. भिंतीवर थुंकू नका लिहूनही लोक थुंकतात. तसंच काहीसं ठाकरे सरकारचं झाल्याचा टोला नितेश राणे यांनी लगावला आहे. (political rivalry on Metro car shed project at Mumbai’s Kanjurmarg)
कांजूरमार्ग कारशेड प्रकरणी उच्च न्यायालयाने जैसे थे परिस्थिती ठेवण्याचा आदेश दिल्यानंतर नितेश राणे यांनी ट्विट करून राज्य सरकारवर टीका केली आहे. काही भिंतींवर थुंकना मना है, असं लिहिलेलं असतं. तिथेच लोक जास्त थुंकतात. ठाकरे सरकारचंही तेच झालं आहे, अशी टीका राणे यांनी केली आहे.
मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावर बालनाट्य
भाजपचे नेते आशिष शेलार यांनीही या मुद्द्यावरून ठाकरे सरकारवर टीका केली आहे. मेट्रो कारशेडच्या कामाला कोर्टाने स्थगिती दिली आहे. आरेबाबत हे सरकार सर्वोच्च न्यायालयाचे आदेशही मान्य करत नाही. त्यांना कांजूरमार्ग बाबत संयुक्त समितीने दिलेला अहवालही मान्य नाही. आता उच्च न्यायालयाने दिलेला निर्ण तरी मान्य होईल का? असा सवाल करतानाच स्वत:च्या अहंकरासाठी मुंबईकरांचे अजून किती नुकसान करणार? असा सवाल शेलार यांनी केला आहे. तसेच मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावर आता बालनाट्य सुरू आहे. बालहट्टामुळेच मुंबईकरांचे नुकसान होत आहे, अशी टीकाही त्यांनी केली.
पर्यावरणवाद्यांचं ऐकणं म्हणजे अहंकार का?: गोऱ्हे
कांजूरमार्ग कारशेडबाबतचा निर्णय हा कोणत्याही अहंकारातून घेतलेला नाही. पर्यावरणवाद्यांचं ऐकून निर्णय घेणं म्हणजे अहंकार का? असा सवाल करतानाच कोणत्याही गोष्टींचा विपर्यास करू नका, असं शिवसेना नेत्या निलम गोऱ्हे यांनी सांगितलं. कोर्टाने कांजूरमार्गच्या कामाला दिलेली स्थगिती म्हणजे अंतिम निर्णय नाही. कोर्ट जनतेच्या बाजूने आणि पर्यावरणाच्या रक्षणाचाच निर्णय देईल, असा आम्हाला विश्वास आहे, असंही त्या म्हणाल्या. मेट्रोच्या कामात मिठाचा खडा कोण टाकतंय ते काल मुख्यमंत्र्यांनी सांगितलंच आहे. मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन म्हणणं अहंकार आहे की आणखी काय आहे? हे जनतेला चांगलच ठाऊक आहे, असा टोलाही त्यांनी लगावला. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आम्हाला अभ्यास करायचा सल्ला दिला आहे. पण त्यांना त्यांचं गणित हव तसं सोडवता येत नाही. यावरून त्यांचा अभ्यास किती आहे हे दिसून येतं, असा चिमटाही त्यांनी काढला.
निर्णय दुर्देवी: सावंत
कांजूरमार्ग कारशेडप्रकरणाचा कोर्टाचा निर्णय दुर्देवी आहे. गेल्या वर्षभरात केंद्र सरकारकडून विकास कामात खोडा घालण्याचं काम सुरू आहे. रेल्वे मंत्री पीयूष गोयल यांनी आधी पत्रं दिलं होतं. आता हे प्रकरण कोर्टात जाऊन थांबवलं गेलं. राज्य भाजपच्या सांगण्यावरूनच हे होत आहे, असं सांगतानाच 1906 पासूनच कांजूरची जागा महाराष्ट्र सरकारची असून भाजप खासगी विकासकांच्या आज्ञेत असल्यासारखे वागत असल्याची टीका काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी केली.

