सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावरील बलात्काराचे आरोप मागे घेण्यात आल्यानंतरही विरोधकांकडून त्यांच्यावर टीका केली जात आहे.
मुंबई: सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावरील बलात्काराचे आरोप मागे घेण्यात आल्यानंतरही विरोधकांकडून त्यांच्यावर टीका केली जात आहे. त्यावरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विरोधकांना चांगलंच फटकारलंय. मागच्या काळात कुणी काय लपवाछपवी केलीय हे सांगू का?, असा इशाराच अजित पवार यांनी दिला आहे.
अजित पवार यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना ही टीका केली. धनंजय मुंडे यांनी या प्रकरणावर आधीच स्पष्टीकरण दिलं आहे. तरीही त्यावरून विरोधक टीका करत आहेत. आधी विरोधकांनी मुंडेंवर आरोप केले. नंतर तोंडघशी पडल्यावर आता वेगळा आरोप केला आहे. विरोधकांचं टीका करणं हे काम आहे. पण ती कोणत्या पातळीपर्यंत असावी याला मर्यादा आहेत, असं सांगतानाच मागच्या काळात कुणी काय लपवाछपवी केली सांगू का? असा इशारा त्यांनी दिला. कुणाला किती मुलं होती. कुणाचं लग्न झालं होतं, झालं नव्हतं, हे सांगू का? अशा बऱ्याच गोष्टी मला माहीत आहे, सांगायलाच हव्या का? असा सवालही त्यांनी केला.
ओबीसींची जनगणना हा केंद्राचा अधिकार
यावेळी अजित पवार यांनी जातीनिहाय जनगणनेवरूनही प्रतिक्रिया व्यक्त केली. जातिनिहाय जनगणनेची मागणी खूप जुनी आहे. अनेक वर्षांपासूनची आहे. मागच्या लोकसभेतही ही मागणी करण्यात आली होती. त्यामुळे जनगणना करायची की नाही हा निर्णय केंद्र सरकारचा आहे. तो लोकसभेचा अधिकार असून केंद्राने याबाबत निर्णय घ्यावा, अशी मागणीही त्यांनी केली. जनतेच्या ज्या मागण्या असतात त्यावर सरकारने लक्ष द्यायला हवे. केंद्र सरकार या गोष्टींचा विचार करेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. मराठा आरक्षणावरून ओबीसी आणि मराठा समाजात कोणताही गैरसमज नसल्याचंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.

