शेतकरी कृषी कायद्याविरोधात मुंबईच्या रस्त्यावर, कृषीमंत्री दादा भुसेंनी केंद्राला काय सांगितलं?

0 झुंजार झेप न्युज

महाराष्ट्र सरकार या शेतकऱ्यांच्या सोबत असल्याचं आश्वासन राज्याचे कृषिमंत्री आणि पालघर चे पालकमंत्री दादा भुसे यांनी दिली आहे.

पालघर: राज्याचे कृषीमंत्री दादा भुसे आज पालघर दौऱ्यावर आहेत. दादा भुसे यांनी पालघर येथे जिल्हा नियोजन समितीच्या कार्यक्रमादरम्यान कृषी कायदे आणि शेतकरी आंदोलन याबाबत संवाद साधला. केंद्र सरकारच्या कृषी कायद्याविरोधात दिल्लीत सुरू असलेल्या आंदोलनाच्या समर्थनार्थ मुंबईतील आझाद मैदान येथे हजारो शेतकऱ्यांनी दाखल झाले आहेत. आझाद मैदानात हजारो शेतकरी दाखल झाले असून शिष्टमंडळ राज्यपाल यांची भेट घेऊन या कायद्यांना आपला विरोध दर्शवणार आहेत. महाराष्ट्र सरकार या शेतकऱ्यांच्या सोबत असल्याचं आश्वासन राज्याचे कृषिमंत्री आणि पालघर चे पालकमंत्री दादा भुसे यांनी दिली आहे.

कृषी कायद्यात अनेक त्रुटी असल्याने केंद्र सरकारने या कायद्यांचा पुनर्विचार करावा, असं आवाहन दादा भुसे यांनी केले. या कृषी कायद्यांना सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिल्याने केंद्र सरकारने शेतकऱ्यांचा भावनांचा विचार करून त्याच्यात बदल करावे अशी मागणी भुसे यांनी केली आहे. तर, या शेतकऱ्यांसोबत महाविकासआघाडी सरकार असून कोरोना असल्यामुळे याठिकाणी मुख्यमंत्री जाऊ शकले नाहीत. अन्यथा, मुख्यमंत्री स्वतः मैदानात जाऊन शेतकऱ्यांची भेट घेणार होते, असं दादा भुसे म्हणाले. जर शेतकऱ्यांचं शिष्टमंडळ मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना भेटणार असेल तर त्यांचं स्वागत असल्याचे दादा भुसेंनी सांगितले.

शेतकरी आझाद मैदानाकडे परत निघाले

रविवारी संध्याकाळपासून आझाद मैदानात धरणे धरणाऱ्या शेतकरी आंदोलकांनी राजभवनाच्या दिशेने कूच केली आहे. मात्र, मोठ्या संख्येने हे मोर्चेकरी राजभवनाच्या दिशेने निघाल्याने पोलिसांनी या आंदोलकांना अडवलं आहे. त्यामुळे मोर्चेकरी आणि शेतकऱ्यांमध्ये झटापट झाली. त्यामुळे मोर्चेकऱ्यांनी ‘दादागिरी नही चलेगी’ अशा घोषणा देत रस्त्यावरच एल्गार पुकारल्याने प्रचंड गोंधळ निर्माण झाला आहे. राज्यपाल राजभवनावर नसल्यानं त्यांना देण्यात येणार निवेदन शेतकरी नेत्यांनी फाडून टाकले.

आझाद मैदानात नेत्यांची भाषण झाल्यानंतर शेतकरी नेते अजित नवले, सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर, तिस्ता सेटलवाड, काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष भाई जगताप आणि सचिन सावंत आदी नेते मोर्चेकऱ्यांसोबत राजभवनाकडे निघाले होते. या नेत्यांसोबत हजारो मोर्चेकरी लालबावटे घेऊन राजभवनाकडे निघाले. अचानक मोठ्या प्रमाणावर जमाव जमा झाल्याने पोलिसांनी मेट्रो सिनेमाजवळ शेतकऱ्यांना अडवलं. यावेळी पोलीस आणि आंदोलकांमध्ये झटापट झाली. त्यामुळे ‘मोदी सरकार हाय हाय’, ‘मोदी सरकार मुर्दाबाद’च्या घोषणा यावेळी शेतकऱ्यांनी दिल्या. त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी मेट्रो सिनेमाजवळच्या चौकातच ठिय्या आंदोलन सुरू केलं. काँग्रेस नेते भाई जगताप, सचिन सावंत, अजित नवले यांनी रस्त्यावर बसून जोरदार घोषणाबाजी केली. त्यामुळे वातावरण तापलं होतं.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.