शिवसेनेच्या नेत्यांनी सदबुद्धी सुचली असेल म्हणून ते आझाद मैदानात गेले नाहीत, अशी खोचक टीका विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली.
भंडारा : कृषी कायद्यांना विरोध तसेच इतर मागण्यांसाठी आज (25 जानेवारी) मुंबईतील आझाद मैदानात अनेक शेतकरी जमले होते. राष्ट्रवादी आणि काँग्रेसचेही नेतेही यावेळी हजर होते. मात्र, या सभेमध्ये शिवसेनेचे नेते उपस्थितन सल्यामुळे ‘शिवसेनेच्या नेत्यांनी सदबुद्धी सुचली असेल म्हणून ते आझाद मैदानात गेले नाहीत’, अशी खोचक टीका विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली. आझाद मैदानावरील सभेला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात आदी दिग्गज नेते उपस्थित होते. मात्र, शिवसेनेचे नेते उपस्थित नसल्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी वरील वक्तव्य केले. ते भंडाऱ्यात बोलत होते.
“कदाचित शिवसेना नेत्यांना सदबुद्धी आली असेल, त्यामुळे आझाद मैदानात शिवसेना नेते आले नाही,” असे फडणवीस म्हणाले.
आम्ही वीज वापरली नाही, वीजबील भरणार नाही
यावेळी देवेंद्र फडणवीसांनी राज्य सरकारला वीजबिलाच्या मुद्द्यावरुन चांगलंच घेरलं. वापरलेल्या विजेचं बील आम्ही भरायला तयार आहोत. पण जी वीज वापरली नाही, ते बील आम्ही भरणार नाही, असा इशारा त्यांनी राज्य सरकारला दिला. तसेच भंडारा येथील रुग्णालायात झालेल्या दुर्घटनेत 10 बालकांचा मृत्यू झाला. त्यांच्या मातांचे अश्रू अजून सुकले नाहीत. तोच सरकारने सिव्हील सर्जनला वर्धा इथे रुजे करुन घेतलं आहे. हे सरकार असंवेदनशील आहे, असे फडणवीस म्हणाले. तसेच, सरकारने जनाची नाही तर मनाची तरी लाज बाळगावी असे म्हणत, सरकारवर ताशेरे ओढले.
काही ढोंगी लोक शेतकऱ्यांची दिशाभूल करत आहेत
कृषी कायद्यांच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी देशातील शेतकऱ्यांना त्यांचा अधिकार देऊ पाहत आहेत. मात्र, काही ढोंगी लोक या शेतकऱ्यांची दिशाभूल करत आहेत, अशी टीका राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केली. मुंबईत आझाद मैदानात आलेला मोर्चा हा आदिवासींचा होता. मात्र, काहीजण त्या मोर्चाला शेतकरी मोर्चा सांगून दिशाभूल करत असल्याचा आरोपही देवेंद्र फडणवीस यांनी केला.

