मुंबईत आलेला मोर्चा हा आदिवासींचा आहे. मात्र, काहीजण त्या मोर्चाला शेतकरी मोर्चा सांगून दिशाभूल करत असल्याचा आरोपही देवेंद्र फडणवीस यांनी केला.
नागपूर: कृषी कायद्यांच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी देशातील शेतकऱ्यांना त्यांचा अधिकार देऊ पाहत आहेत. मात्र, काही ढोंगी लोक या शेतकऱ्यांची दिशाभूल करत आहेत, अशी टीका राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केली. मुंबईत आलेला मोर्चा हा आदिवासींचा आहे. मात्र, काहीजण त्या मोर्चाला शेतकरी मोर्चा सांगून दिशाभूल करत असल्याचा आरोपही देवेंद्र फडणवीस यांनी केला.
ते सोमवारी भंडारदारा येथे आयोजित करण्यात आलेल्या सभेत बोलत होते. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी कृषी कायद्यांना होणारा विरोध, वीजबिल माफी, भंडारा दुर्घटनेवरुन सत्ताधाऱ्यांना लक्ष्य केले. महाराष्ट्रातील धान खरेदीची व्यवस्था महाविकासआघाडी सरकारने उद्ध्वस्त केली. हा भ्रष्टाचार बाहेर आला तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे अर्धे नेते जेलमध्ये जातील. या सरकारमध्ये इतका भ्रष्टाचार आहे की उद्या हे लोक समुद्राच्या लाटा मोजायचेही पैसे मागतील, असे टीकास्त्र देवेंद्र फडणवीस यांनी सोडले.
वीज बील माफीसाठी पैसे नाहीत, मग 5 हजार कोटीची बिल्डर्सना सुट कशी-फडणवीस
सामान्य नागरिकांना वीजबिल माफी देण्यासाठी राज्य सरकारकडे पैसे नाहीत. मग या सरकारने मुंबई व पुण्यातील बिल्डरांना प्रीमियममध्ये सूट देण्यासाठी 5 हजार कोटी रुपये कुठून आणले, असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला. या निर्णयासाठी संपूर्ण मंत्रिमंडळ एकटवले. या निर्णयासाठी प्रत्येक मंत्र्याला किती बुके (पैसे) मिळाले, हे आम्हाला माहिती असल्याचे फडणवीस यांनी म्हटले. कोणत्याही गावात अधिकारी वीज जोडणी तोडण्यासाठी आल्यास त्यांना गुलाबाचं फुल द्या आणि गाडीत बसून परत पाठवा, असा सल्लाही फडणवीस यांनी दिला.
‘महाविकासआघाडी सरकारला विदर्भाबद्दल राग आहे’
विदर्भाबद्दल महाविकासआघाडी सरकारच्या मनात राग आहे. समृद्धी महामार्गाची पाहणी करायची होती म्हणून मुख्यमंत्री पहिल्यांदा विदर्भात आले. या सरकारने विदर्भातील प्रकल्प बंद केले. विदर्भाला पैसे मिळायचे ते वैधानिक महामंडळही बंद केले, असा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला.

