कोरोनाच्या लसीकरणावरून केंद्र सरकार आणि महाराष्ट्र सरकारमध्ये तू तू मै मै सुरू झाली आहे.
नवी दिल्ली: कोरोनाच्या लसीकरणावरून केंद्र सरकार आणि महाराष्ट्र सरकारमध्ये तू तू मै मै सुरू झाली आहे. महाराष्ट्राला दर आठवड्याला लसीचे 20 लाख डोस देण्याची मागणी महाराष्ट्र सरकारने केंद्राकडे केली आहे. शिवसेनेच्या खासदारांनीही लसीचे अतिरिक्त डोस महाराष्ट्राला देण्याची मागणी केंद्राकडे केली आहे. त्यावर, महाराष्ट्राला 54 लाख कोरोनाच्या लसी दिल्या. मग आतापर्यंत केवळ 23 लाख लसींचच लसीकरण का करण्यात आलं? असा सवाल केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी महाराष्ट्र सरकारला केला आहे.
प्रकाश जावडेकर यांनी ट्विट करून महाराष्ट्र सरकारला कोरोना लसीकरणावरून फटकारले आहे. महाराष्ट्रात आतापर्यंत केवळ 23 लाख लस टोचण्यात आल्या आहेत. केंद्र सरकारने 54 लाख लसी देऊनही अत्यंत कमी लसीकरण करण्यात आलं आहे. राज्यात केवळ 56 टक्के लसीकरण करण्यात आलं आहे, असं जावडेकर यांनी सांगितलं.
मोदींच्या बैठकी आधी ट्विट
शिवसेनेचे खासदार राज्यात कोरोनाचे अतिरिक्त डोस मागत आहेत. पूर्वी कोरोना संकटात महाराष्ट्रात योग्य नियोजन झालं नाही. आता लसीकरणातही तेच होत आहे, अशी टीकाही त्यांनी केलं आहे. विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज कोरोना परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर देशातील सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार आहेत. त्याचवेळी नेमकं जावडेकर यांनी ट्विट केल्याने तर्कवितर्क लढवले जात आहेत.
महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्ण
देशात पुन्हा कोरोनाचा कहर निर्माण झाला आहे. महाराष्ट्र, पंजाब, कर्नाटक, गुजरात आणि तामिळनाडू राज्यात सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण आहेत. महाराष्ट्रात गेल्या 24 तासांत 17864 रुग्ण सापडले आहेत. तर केरळ, कर्नाटक आणि पंजाबमध्ये एक हजार रुग्ण सापडले आहेत.
टोपेंनी काय मागणी केली?
दरम्यान, राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे काल दिल्लीत होते. त्यांनी केंद्रीय आरोग्यमंत्र्यांकडे लसीच्या अतिरिक्त साठ्याची मागणी केली आहे. प्राधान्यक्रमाच्या गटातील सुमारे 1.77 कोटी जनतेचे लसीकरण करण्याचे उद्दिष्ट असून त्यासाठी 2.20 कोटी डोस उपलब्ध करून देण्याची मागणी राजेश टोपे यांनी केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांच्याकडे केली. यावेळी केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण उपस्थित होते. राज्यात कोरोना प्रतिबंध लसीकरण मोहीम मोठ्या प्रमाणात व यशस्वीरीत्या राबविण्यात येत आहे. या अनुषंगाने आरोग्य कर्मचारी, अत्यावश्यक सेवा पुरवणारे कर्मचारी त्याचबरोबर 60 वर्षावरील व 45 वयोगटा वरील (सहव्याधी असलेले) सर्वांना लस देण्यात येत आहे. त्यामध्ये 1.77 कोटी लोकांचे लसीकरण करण्याचे उद्दिष्ट असून या सर्वांना पहिला डोस मे पर्यंत तर दुसरा डोस जून पर्यंत देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यासाठी 2.20 कोटी कोव्हीडशिल्ड व कोवाक्सिन लसींचा आवश्यकता आहे. या अनुषंगाने दर आठवड्यात 20 लाख लसींचा पुरवठा करण्याची विनंती टोपे यांनी केंद्रीय आरोग्यमंत्र्यांकडे केली आहे. राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असून त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी तत्काळ पुरेशा लसींचा पुरवठा करण्याची मागणीही त्यांनी केली.

