सरकारनं दिलेल्या सवलतींचा गैरफायदा घेतला जात आहे. कारवाई केली तर ती फार कठोर असेल. अनिश्चित काळासाठी दुकानं बंद करण्याची कारवाई होऊ शकते, असं भुजबळ म्हणाले.
नाशिक : राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात वाढत आहे. नाशिकमध्येही दिवसेंदिवस कोरोना रुग्णांच्या संख्येत भर पडत आहे. अशावेळी अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी नाशिककरांना एकप्रकारे इशाराच दिला आहे. सरकारनं दिलेल्या सवलतींचा गैरफायदा घेतला जात आहे. कारवाई केली तर ती फार कठोर असेल. अनिश्चित काळासाठी दुकानं बंद करण्याची कारवाई होऊ शकते, असं भुजबळ म्हणाले.
“दुर्दैवाने कोरोनाची दुसली लाट आली हे नक्की आहे. नाशिकला 10 हजार 800 कोरोना रुग्ण आहेत. यंत्रणा कामाला लागलेली आहे. 15 मार्च रोजी पॉझिटिव्हिटीचा दर 41 टक्के होता, आता तो 32 टक्क्यांवर आहे. चाचण्यांचं प्रमाण वाढवलं आहे. जिल्हा शासकीय रुग्णालयात एका दिवसात 5 हजार स्वॅब तपासण्याची व्यवस्था केली आहे. रोज 20 हजार तपासण्या होण्याची क्षमता आहे. पण लोक तिथपर्यंत गेले तरच उपयोग होणार आहे”, असं भुजबळ म्हणालेत.
‘व्यासवायिक, भाजी मार्केटमध्ये मोठा गैरफायदा’
छगन भुजबळ यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एक खंतही व्यक्त केलीय. सरकारनं दिलेल्या सवलतींचा गैरफायदा घेतला जातोय. व्यावसायिक आणि भाजी मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात गैरफायदा घेतला जात असल्याचं भुजबळ म्हणाले. अशावेळी कारवाई केली तर ती फार कठोर असेल. अनिश्चित काळासाठी दुकानं बंद करण्याची कारवाई होऊ शकते, असा इशारा भुजबळांनी दिला आहे. तसंच कोणती लस घेतली. याची माहिती सल घेणाऱ्यानं ठेवायलाच हवी. 28 दिवसानंतर पुन्हा तोच डोस घेणं आवश्यक आहे. मंगल कार्यालय, आदी परवानगी अशलेल्या कार्यक्रमांना घातलेली बंधणं पाळणं आवश्यक आहे. नाहीतर सरकारचा नाईलाज होईल, असंही भुजबळ म्हणाले.
‘पुन्हा पुर्ण लॉकडाऊनचा निर्णय लांब नाही’
कोरोना बरा होतो मात्र काहींना कायमचं दुखणं देतो. खासगी रुग्णालय किंवा खासगी लॅबने रुग्णांची माहिती सरकारी यंत्रणांना देणं आवश्यक आहे. नागरिक जबाबदारीनं वागले नाही तर पुन्हा पूर्ण लॉकडाऊन करायचा निर्णय लांब नाही. अर्थचक्र थांबवायचं नसेल तर बंधनं पाळा, अशी विनंतीही भुजबळ यांनी नाशिककरांना केली आहे.
‘नो शुभमंगल, ओन्ली सावधान’
नाशकात 17 मार्चपासून विवाह सोहळ्यांवर पूर्णत: बंदी घालण्यात आली आहे. कोरोना प्रादुर्भावाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर नाशिकच्या जिल्ह्याधिकाऱ्यांनी हा निर्णय घेतला आहे. पुढील आदेशापर्यंत शहरातील विवाह सोहळ्यांवर पूर्णत: बंदी असेल. शहरात मागील काही दिवसांत कोरोना रुग्णांमध्ये प्रचंड वाढ झालेली पाहायला मिळतीय. त्यामुळे पालिका प्रशासन अलर्ट मोडवर आहे. त्यानुसार आता शहरात नो शुभमंगल ओन्ली सावधान असणार आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या पुढील निर्णयापर्यंत ही बंदी असणार आहे.

