वृद्धाने एका चिमुकलीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर दिंद्रुड पोलिसांकडून तक्रार घेण्यास विलंब करण्यात आला.
बीड : वृद्धाने एका चिमुकलीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला होता.त्यानंतर दिंद्रुड पोलिसांकडून तक्रार घेण्यास विलंब करण्यात आला. मात्र, सामाजिक कार्यकर्त्यांच्या पुढाकाराने तीन दिवसानंतर अखेर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नेमकं प्रकरण काय?
जिल्हा परिषद शाळेच्या आवारातील हातपंपावर पाणी भरण्यासाठी गेलेल्या एका चिमुकलीचे तोंड दाबून शाळेच्या बाथरुममध्ये अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न झाल्याने एकच खळबळ माजली आहे. हे कृत्य एका 63 वर्षीय वृद्धाकडून झाल्याने संताप व्यक्त होतोय. याप्रकरणी चिमुकलीच्या आईने दिंद्रुड पोलीस ठाणे गाठून कारवाईची मागणी केली. मात्र, पोलिसांनी पीडितेच्या मुलीला अक्षरशः दोन दिवस ताटकळत ठेवल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे.
अखेर सामाजिक कार्यकर्ते आणि पत्रकारांनी पुढाकार घेतल्यानंतर आरोपी वृद्ध व्यक्तीविरोधात तब्बल तीन दिवसांनंतर गुन्हा दाखल करुन त्याला अटक करण्यात आली आहे. किसन थावरे असं वृद्धाचे नाव आहे.
दिंद्रुड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आनंदगाव येथे किसन थावरे हा 63 वर्षाचा वृद्ध वास्तव्यास आहे. गावातीलच जिल्हा परिषद शाळेच्या आवारात हात पंप आहे. दोन सख्या बहिणी पाणी भरण्यासाठी गेल्या होत्या. यावेळी किसन थावरे याने यातील एका चिमुकलीचे तोंड दाबून तिला शाळेतील बाथरुममध्ये फरफटत नेले आणि त्या चिमुकलीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला.
मुलीच्या बहिणीने आरडाओरड केल्यानंतर आरोपीने तिथून पलायन केले. घटना रविवारी दुपारी घडली होती. याचवेळी चिमुकलीच्या आईने तक्रार देण्यासाठी दिंद्रुड पोलीस ठाणे गाठले. मात्र, पोलिसांनी असे काही घडलेच नाही म्हणत तब्बल 2 दिवस पीडित कुटुंबाला ताटकळत ठेवल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे.
सदर घटना सोशल माध्यमांवर व्हायरल झाल्यानंतर सामाजिक कार्यकर्त्या सत्यभामा सौंदरमल आणि कॉम्रेड सुहास झोडगे, पत्रकार संघाचे अध्यक्ष संतोष स्वामी यांनी पोलिसांत धाव घेतली. तब्बल तीन दिवसांनंतर पोलिसांनी गुन्ह्याची नोंद करत आरोपी वृद्धाला अटक केली आहे.
दिंद्रुड पोलिसांच्या तक्रारी वाढल्या
माजलगाव तालुक्यातील सर्वात मोठे पोलीस ठाणे म्हणून दिंद्रुड पोलीस ठाण्याकडे पाहिले जाते. मात्र, इथे आलेल्या फिर्यादींना पोलिसांकडून मदत मिळत नसल्याची तक्रार आहे. अनेक गुन्ह्यात पोलीस तक्रार न घेता परस्पर प्रकरण मिटवून घेतात. त्यामुळे पीडित कुटुंबावर अन्याय होतोय. त्यामुळे या पोलीस ठाण्याला महिला अधिकारी नियुक्त करावे, अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्या सत्यभामा सौंदरमल यांनी केले आहे.

