पैशाच्या हव्यासापाई वर्धा जिल्ह्यात 2 युवकांनी चोरीचा मार्ग निवडला आणि दोघांनाही तुरुंगाची हवा खावी लागलीय.
वर्धा : पैशांची गरज पूर्ण करण्यासाठी वेगवेगळे मार्ग शोधले जातात. कुणी नोकरी, व्यवसाय, मेहनतीचे मार्ग निवडतात, तर कुणी अन्य मार्ग. पैशाच्या हव्यासापाई वर्धा जिल्ह्यात 2 युवकांनी चोरीचा मार्ग निवडला आणि दोघांनाही तुरुंगाची हवा खावी लागलीय. या दोघांनाही पोलिसांनी अटक केलीय. हे चोरटे बँकेत हेरगिरी करून पेन्शनर्स आणि वयोवृद्धांना लक्ष्य करायचे.
निलेश विनायकराव गिरडकर आणि चंद्रकांत दशरथ काटकर अशी पोलिसांनी अटक केलेल्या चोरट्यांची नावं आहेत. हे दोघेही एकुर्ली येथील रहिवासी आहेत. वर्धेत फेब्रुवारी, मार्च महिन्यात पेन्शनर्स आणि वयोवृद्धाला बँकेतून घरी परतताना लुटण्याच्या घटना घडल्यात. त्यावरुन रामनगर पोलिसांनी वेगवेगळ्या अँगलनं तपास केलाय. त्यात दोन्ही चोऱ्यांची पद्धत सारखी असल्याचं पोलिसांच्या तपासात पुढं आलंय, अशी माहिती वर्ध्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी पियुष जगताप यांनी दिली.
हे दोघेही चोरटे सुरुवातीला बँकेत जाऊन लक्ष ठेवायचे. ते संशय येणार नाही, असं वागाायचे. लक्ष ठेवून सावज टप्प्यात येताच सुनसान मार्गावर डाव साधायचे. पोलिसांनी या घटनेनंतर आपल्या कर्मचाऱ्यांना शहराच्या विविध बँकांमध्ये तपासणीसाठी पाठवले. पोलिसांना काही सीसीटीव्ही फुटेजही मिळाले. त्यात पोलिसांना चेहरे जरी दिसले नाही, तरी जिन्सच्या पेहरावावरून पोलीस संशयितांपर्यंत पोहोचले. त्या अनुषंगाने पोलिसांनी पुढं तपास करत बँकांमध्ये सापळा रचला आणि दोन जणांना बँक ऑफ महाराष्ट्र समोरून ताब्यात घेतलं.
पोलिसांनी चोरट्यांना जेरबंद केल्यानंतर त्यांच्याकडून तीन गुन्हे उघडकीस आलेत. पोलिसांची ही दमदार कामगिरी केल्यानं नागरिकांनीही समाधान व्यक्त केलंय. हे चोरटे अट्टल नाहीत, मात्र पैशांच्या गरजेने त्यांना या मार्गावर नेल्याचं तपासात पुढे आलं आहे.

