केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज पश्चिम बंगालच्या दक्षिण 24 परगनाच्या गोसाबा येथे जाहीर सभा घेऊन थेट ममता बॅनर्जी सरकारला ललकारले.
कोलकाता: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज पश्चिम बंगालच्या दक्षिण 24 परगनाच्या गोसाबा येथे जाहीर सभा घेऊन थेट ममता बॅनर्जी सरकारला ललकारले. पश्चिम बंगालला भ्रष्टाचाराने पोखरले आहे. आमची सत्ता आल्यावर आम्ही बंगालधून भ्रष्टाचाराचं समूळ उच्चाटन करू, असं सांगतानाच सत्ता येताच एसआयटी स्थापन करून भ्रष्टाचाऱ्यांना थेट तुरुंगात पाठवू, असा इशारा अमित शहा यांनी दिला आहे.
सभेला संबोधित करताना अमित शहा यांनी ममता बॅनर्जी सरकारच्या कारभारावर टीकास्त्र सोडलं. राज्यातून टीएमसी सरकार हटवायचं आहे. आजही बंग भूमी भ्रष्टाचाराने बरबटलेली आहे. आमचं सरकार येताच एसआयटी स्थापन करून भ्रष्टाचारी लोकांना तुरुंगात पाठवलं जाईल, असं ते म्हणाले. तसेच सरकार आल्यानंतर सुंदरवन जिल्ह्याची निर्मिती केली जाणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. गंगासागर मेळ्यावर लाखो रुपये खर्च करून हा मेळा आंतरराष्ट्रीय दर्जाचा केला जाणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. भाजप सरकारच्या पहिल्याच कॅबिनेट बैठकीत राज्यात आयुष्मान भारत योजना लागू करण्यात येणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.
मोदींनी पाठवलेल्या निधीवर डल्ला मारला
बंगालमध्ये वादळ आल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राज्यासाठी 10 हजार कोटी रुपये पाठवले होते. मात्र, हे पैसे लोकांपर्यंत पोहोचलेच नाहीत. पुतण्या आणि कंपनीने हा पैसा खाल्ला. मोदींनी पाठवलेल्या पैशावर डल्ला मारण्यात आला आहे. आम्ही एसआयटी स्थापन करून हा पैसा वसूल केल्याशिवाय राहणार नाही. तसेच या निधीवर डल्ला मारणाऱ्यांना तुरुंगात पाठवल्याशिवायही राहणार नाही. वादळग्रस्तांसाठी आम्ही 65000 कोटींचे पॅकेज तयार करू. सुंदरवनमध्ये टुरिस्ट सर्किट तयार करण्यात येईल, असंही ते म्हणाले. दीदींनी त्यांच्या जाहीरनाम्यातून 262 आश्वासने दिली होती. परंतु ते पूर्ण केले नाहीत. त्याचा हिशोब त्यांना द्यावा लागेल. त्या हिशोब देणार नाहीत. त्यामुळे तुम्ही भाजपला निवडून देऊन हिशोब द्या, असं आवाहन त्यांनी केलं.
मोदी स्कीम आणत आहेत, दीदी स्कॅम
पंतप्रधान नरेंद्र मोदी गरीबांसाठी स्कीम आणत आहेत. तर दीदी केवळ पैसे हडप करण्यासाठी स्कॅम आणत आहे, अशी टीका त्यांनी केली. राज्यात होत असलेली घुसखोरी ममता दीदींना रोखता येत नाही. त्यात त्या अपयशी ठरत आहेत. परंतु आमचे सरकार आल्यावर घुसखोरीला लगाम घातल्या जाईल, असंही ते म्हणाले.
सीएए लागू करणार
दरम्यान, शहा यांनी रविवारी पश्चिम बंगालमध्ये निवडणूक जाहीरनामा घोषित केला होता. यावेळी शहा यांनी सत्तेत येताच राज्यात पहिल्याच कॅबिनेटमध्ये सीएए लागू करण्याचा निर्णय घेतला जाईल. तसेच शरणार्थींच्या कुटुंबाला 5 वर्षांपर्यंत दरवर्षी दहा हजार रुपये देण्यात येणार आहे. भ्रष्टाचार आणि लाचखोरीला लगाम लावण्यात येणार असल्याचंही त्यांनी म्हटलं होतं.

