पवारांच्या पाठिंब्याचा आदरच, पण राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडून आले नाही, नवनीत राणांनी चाकणकरांना सुनावलं

0 झुंजार झेप न्युज

तुम्ही खासदार म्हणून जी भूमिका संसदेत मांडली आहे ती खासदारकी तुम्हाला राष्ट्रवादीच्या जीवावर मिळालेली आहे म्हणून मांडता आली आहे, असं राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली चाकणकर म्हणाल्या होत्या. 

दिल्ली : मी राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडून आली नाही, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार साहेबांनी मला समर्थन दिले त्याचा मी आदर करते. पण रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांनी मला सांगू नये कुणी राजीनामा द्यावा ते, अशा शब्दात अमरावतीच्या अपक्ष खासदार नवनीत कौर राणा (Navneet Kaur Rana) यांनी प्रत्युत्तर दिले. 

काय म्हणाल्या रुपाली चाकणकर?

नवनीतजी राणा आपल्याला जर नैतिकतेचा एवढा पुळका आला असेल तर आधी खासदारकीचा राजीनामा द्या आणि मग महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवटीच्या गप्पा करा. कारण आज तुम्ही खासदार म्हणून जी भूमिका संसदेत मांडली आहे ती खासदारकी तुम्हाला राष्ट्रवादीच्या जीवावर मिळालेली आहे म्हणून मांडता आली आहे, असं राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली चाकणकर म्हणाल्या होत्या.

शिवसेना खासदार अरविंद सावंतांविरुद्ध तक्रार

“मी संसदेत बोलत असताना शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी गोंधळ घातला. त्यामुळे मला आक्रमकतेने बोलावे लागले. यानंतर सभागृह तहकूब करण्यात आले. सभागृहातून बाहेर पडताना अरविंद सावंत “आता तुझी बारी आहे, तुला जेलमध्ये टाकावे लागेल” असे म्हणाले” असा आरोप नवनीत राणा यांनी केला आहे.

नेमकं काय घडलं?

विचारांचे मतभेद होऊ शकतात, मनाचे मतभेद होऊ शकत नाही. मला हे अपेक्षित नव्हते. त्याठिकाणी आंध्र प्रदेशमधील खासदार भरतही उपस्थित होते. त्यांनी देखील अरविंद सावंत धमकावल्याच्या दाव्याला दुजोरा दिला. काल अरविंद सावंत प्रचंड चिडले होते, त्यामुळे त्यांना भान राहिले नव्हते. मी याबाबत अध्यक्ष ओमप्रकाश बिर्ला यांच्याकडे तक्रार केली आहे आणि पोलिसांत देखील जाणार आहे, असा इशारा खासदार नवनीत कौर राणा यांनी दिला. 

“जोपर्यंत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे होते, तोपर्यंत कधी महिलांचा अपमान झाला नाही. मात्र उद्धव ठाकरेंच्या काळात परिस्थिती बिघडली आहे” असं टीकास्त्रही नवनीत राणांनी सोडलं.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.