बंगालमध्ये काँग्रेसला पवारांचीच धास्ती, प्रचाराला येऊ नका, काँग्रेस नेत्याचं पत्र

0 झुंजार झेप न्युज

तुमच्यासारखे स्टार प्रचारक तृणमूल काँग्रेसच्या व्यासपीठावर गेले तर सामान्य मतदारांच्या मनातील संभ्रम वाढेल.

नवी दिल्ली: पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीच्या रणसंग्रामात राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी ममता बॅनर्जी  यांच्या बाजूने रिंगणात उतरु नये, अशी विनंती काँग्रेस पक्षाकडून करण्यात आली आहे. काँग्रेसचे बंगालमधील नेते आणि खासदार प्रदीप भट्टाचार्य यांनी तसे पत्रच शरद पवार आणि ‘राजद’चे नेते तेजस्वी यादव यांना लिहले आहे. तुम्ही बंगालच्या प्रचारापासून दूर राहावे, अशी विनंतीच भट्टाचार्य यांनी या दोन्ही नेत्यांना केली आहे.

पश्चिम बंगालमध्ये काँग्रेसचा लढा हा सत्ताधारी तृणमूल काँग्रेस पक्षाशी आहे. तुमच्यासारखे स्टार प्रचारक तृणमूल काँग्रेसच्या व्यासपीठावर गेले तर सामान्य मतदारांच्या मनातील संभ्रम वाढेल. त्यामुळे आपण तृणमूल काँग्रेसच्या प्रचारात ममता बॅनर्जी यांच्या बाजूने उतरू नये, असे भट्टाचार्य यांनी पत्रात म्हटले आहे. त्यामुळे आता यावर शरद पवार काय भूमिका घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

ममता बॅनर्जी यांच्यासाठी पश्चिम बंगालची लढाई कधी नव्हे इतकी अटीतटीची झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचासारखा खंदा नेता आणि भाजपच्या अवाढव्य प्रचारयंत्रणेचा सामना करण्यासाठी ममता बॅनर्जी यांना राष्ट्रीय स्तरावरील मोदीविरोधकांची साथ मिळण्याची गरज आहे. त्यासाठी भाजपला कात्रजचा घाट दाखवणाऱ्या शरद पवार यांच्यासारख्या नेत्याचा ममता बॅनर्जी यांना प्रचारात फायदा होऊ शकतो.

शरद पवारांनी बंगालमध्ये प्रचार केल्यास काँग्रेस दुखावण्याचा धोका

शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महाविकासआघाडीचा भाग आहे. यामध्ये काँग्रेस पक्षाचाही समावेश आहे. त्यामुळे शरद पवार पश्चिम बंगालमध्ये काँग्रेसचा विरोधक असणाऱ्या तृणमूलच्या प्रचारास गेल्यास ही बाब काँग्रेस नेत्यांना खटकू शकते.

तर दुसरीकडे तेजस्वी यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलाची (राजद) बिहारमध्ये काँग्रेसशी युती आहे. गेल्यावर्षीची विधानसभा निवडणुकीही दोन्ही पक्षांनी एकत्र लढवली होती. त्यामुळे तेजस्वी यादवही युतीधर्माच्या बंधनात अडकलेले आहेत.

मात्र, आगामी काळात राष्ट्रीय स्तरावरील समीकरणे जुळवायची असतील तर पश्चिम बंगालमध्ये भाजप विरोधकांनी एकत्र येणे गरजेचे आहे. ही तिसऱ्या आघाडीची नांदी ठरू शकते. मात्र, आता काँग्रेसच्या भूमिकेमुळे यामध्ये खोडा घातला जाण्याची शक्यता आहे.

पश्चिम बंगालमध्ये आठ टप्प्यात मतदान

पश्चिम बंगालमधील विधानसभेच्या 294 जागांसाठी आठ टप्प्यात मतदान होणार आहे. केरळ, आसाम, पुद्दुचेरी, तामिळनाडू या राज्यासंह 2 मे रोजी पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होईल. पश्चिम बंगालमधील ही लढाई ममता बॅनर्जी आणि भाजप या दोहोंच्या भविष्यातील वाटचालीच्यादृष्टीने निर्णायक ठरणार आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.