दोन अक्षराच्या पत्यावरुन अडीच वर्षांपासून फरार आरोपीला नवी मुंबई पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
नवी मुंबई : दोन अक्षराच्या पत्यावरुन अडीच वर्षांपासून फरार आरोपीला नवी मुंबई पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. नवी मुंबई पोलिसांनी चाणाक्षपणे आणि चतुराईने आरोपीला बेड्या घातल्या. मुंबई एपीएमसी मार्केटमधून अडीच वर्षांपासून फरार आरोपी मुज्जाफर उस्मान फ्रूटवाला याच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत.
दोन अक्षराच्या पत्यावरुन आरोपीला बेड्या
गुजरातमधील सुरतच्या वरवली नाका परिसरातून त्याला अटक करण्यात आली आहे. सुरत शहरातील वरवली नाका केवळ एवढ्याच पत्त्यावरून नवी मुंबई पोलिसांनी कौशल्याने गुजरात मधील सय्यद वाडा, वरवली नाका, सुरत येथून आरोपीला अटक केली.
वरवली बाजार परिसरातील मस्जिदितून आरोपीचा चुलता ताब्यात घेतल्यावर आरोपीच्या सासरवाडीची माहिती पोलिसांनी मिळाली. सासरवाडीला आरोपीच्या मेव्हण्याकडे तपास केला असता आरोपी त्याच्या मुळगावी जाऊन सेल्समनचे काम करत असल्याचे पोलिसांना समजले. त्यावर पोलिसांनी त्याच्या राहत्या घरून त्याला ताब्यात घेऊन अटक केली.
पोलीस उपायुक्त सुरेश मेंगडे, सहा. पोलीस आयुक्त विनायक वत्स, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विकास रामगुडे यांच्या मार्गदर्शनाखाली एपीएमसी मार्केट पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी यांनी ही कामगिरी केली.
विश्वास ठेवणे व्यापाऱ्याला पडले महागात
वरवली नाका कर्नाटक असा खोटा पत्ता सांगून गेली सात वर्षांपासून कलिंगड व्यापारी राजाराम माने यांच्याकडे मुज्जफर कामाला राहिला होता. सात वर्ष प्रामाणिकपणे काम करून त्याने माने यांचा विश्वास संपादन केला. त्यामुळे संपूर्ण व्यापार आणि व्यवहार त्याच्या हातात देऊन माने कामानिमित्त दोन महिन्यासाठी बाहेरगावी गेले होते. त्याचाच गैरफायदा घेत आरोपीने भर कलिंगड मौसमात मार्च २०१८ ते जून २०१८ या चार महिन्यात एक करोड सोळा लाख ८४ हजार रुपये स्वतःच्या खात्यात जमा करून पलायन केले होते.
व्यापाऱ्यांनो जागे व्हा!
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत पाच मार्केट असून हजारो व्यापारी येथे व्यापार करतात. तर लाखो लोकांची वर्दळ येथे असते. गेली अनेक वर्षांपासून छोटया-मोठ्या चोऱ्यांसह अनेक गुन्हेगारी घटना येथील व्यापाऱ्यांच्या बाबतीत घडल्या आहेत. त्यामुळे आपल्याकडे कामाला ठेवलेल्या व्यक्ती विषयी संपूर्ण माहिती व्यापाऱ्यांनी ठेवणे अत्यावश्यक आहे. शिवाय सीसीटीव्ही कॅमेरे लावून कर्मचाऱ्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवणे. आर्थिक व्यवहारांची गोपनीयता राखणे आणि सर्वात महत्वाचे म्हणजे पहिल्यापासून परिचयातील व्यक्ती कामाला ठेवल्यास अशा घटनांना आळा बसण्याची शक्यता आहे.

