अहमदनगरच्या अमरधाममध्ये एकाच वेळी 22 जणांवर अंत्यसंस्कार करावे लागले आहेत.
अहमदनगर: कोरोना विषाणू संसर्गाचं भयानक रुप आता समोर येत आहे. कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेत मोठ्या प्रमाणावर सामुहिक संसर्ग होतोय. काही दोन दिवसांपूर्वी बीड जिल्ह्यातील आंबाजोगाईमध्ये एका सरणावर 8 जणांवर अंत्यंसस्कार केल्याचं समोर आलं होतं. तसाच प्रकार अहमदनगरमध्येही समोर आला आहे. अहमदनगरच्या अमरधाममध्ये एकाच वेळी 22 जणांवर अंत्यसंस्कार करावे लागले आहेत. तर, दिवसभरात एकूण 42 जणांवर अंत्यसंस्कार करण्यात आले.
22 जणांचे सरणावर अंत्यसंस्कार
अहमदनगर येथील अमरधाममध्ये असच ह्दयद्रावक चित्र समोर आलं असून अमरधाम मध्ये सरणावर एकाचवेळी 22 मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्याची वेळ आली. विद्युत दाहिनीत दिवसभरात 20 मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. दिवसभरात एकुण तब्बल 42 जणांवर अंत्यसंस्कार झाल्याच समोर आलंय.
अमरधाममधील ह्दयद्रावक चित्र
6 मृतदेह एकाच वेळी नेण्याची नामुष्की
अहमदनगर महापालिकेसमोर कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांवर अंत्यसंस्कार करण्याचं आव्हानं उभं राहिलं होतं. शववाहिनीतून एकाचवेळी सहा मृतदेह भरून अमरधाममध्ये नेण्याची नामुष्की महानगरपालिकेवर ओढावलीय.
अहमदनगरमधे 1270 रुग्णांचा मृत्यू
अहमदनगरमध्ये जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असुन कोरोनामुळे आत्तापर्यंत 1270 जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्हा प्रशासनाने काल दिलेल्या आकडेवारीत 15 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती दिलीय. त्यामुळे संख्येचा ताळमेळ बसत नाही. अहमदनगर जिल्हयात सध्या 11 हजार 237 अँक्टिव्ह रुग्ण आहेत.
बीडच्या आंबाजोगाईमध्ये एकाच सरणावर 8 जणांवर अंत्यसंस्कार
अंबाजोगाईतील स्वामी रामानंद तीर्थ कोव्हिड सेंटरमध्ये कोरोनाने मृत्यू झालेल्या 8 जणांवर एकाच सरणावर अंत्यविधी करण्याची दुर्दैवी वेळ अंबाजोगाई नगर पालिकेवर आली. अंबाजोगाई नगर पालिकेने पठाण मांडवा रस्त्यावरील कोव्हिड रुग्णांच्या अंत्यसंस्काराच्या ठिकाणी एकाच सरणावर या 8 जणांना अग्निडाग दिला. यामध्ये 1 महिला असून सर्व मयत रुग्ण 60 वर्षापुढील आहेत.
दरम्यान, महाराष्ट्रात दररोज 50 हजारांपेक्षा जास्त कोरोना रुग्ण समोर येत आहेत. गुरुवारी महाराष्ट्रात 56 हजार 286 कोरोना रुग्ण आढळले. महाराष्ट्रातमध्ये कोरोनाची दुसरी लाट असून कोरोना मोठ्या प्रमाणात वाढत आहे.

