संचारबंदीचा पोलिसांचा बंदोबस्त असताना गैंगवारमुळे निगडीतील ओटास्कीम परिसर हादरला आहे.
पिंपरी (दि. २१ एप्रिल २०२१) :- संचारबंदीचा पोलिसांचा बंदोबस्त असताना गैंगवारमुळे निगडीतील ओटास्कीम परिसर हादरला आहे. सोमवारी (दि. १९) रात्री पावणेनऊच्या सुमारास झालेल्या हल्ल्यात एका तरुणाचा खून झाला. त्याचा बदला म्हणून मंगळवारी (दि. २०) दुपारी खुनीहल्ला करून एका तरुणाला गंभीर जखमी केले. आकाश ऊर्फ मोन्या गजानन कांबळे (वय २४, रा. सेनेटरी चाळ, भीमनगर, पिंपरी) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.
याबाबत भरत दिलीप लोंढे (वय २०, रा. ओटास्कीम, निगडी) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार सोहेल संतोष जाधव (वय १८) हेमंत खंडागळे (वय १८), गणेश धोत्रे (वय १८), यश ऊर्फ गोंदया खंडागळे (वय १९), वैभव वावरे (वय २१), श्रवण कुन्हाडे (वय १८, सर्व रा ओटास्कीम, निगडी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काय रे कोठे चाललाय, असे मयत आकाश याने रागात विचारले. त्याचा राग आरोपींच्या मनात होता. ओटास्कीम येथे फिर्यादी आणि मयत आकाश हे बोलत थांबलेले असताना आरोपी तिथे आले. आरोपींनी लोखंडी चॉपरसारखे धारदार शस्त्र आकाशच्या पोटात खुपसले. कोयता उगारून शिवीगाळ करून परिसरात दहशत निर्माण करून आरोपी पळून गेले. दरम्यान जखमी आकाशचा मृत्यू झाल्याने पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला.

