आता अमृता फडणवीस रुपाली चाकणकर यांना कशाप्रकारे प्रत्युत्तर देणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
मुंबई: राजकीय शेरेबाजीमुळे सध्या सोशल मीडियावर चर्चेत असलेल्या अमृता फडणवीस यांनी आणखी एक ट्विट केले आहे. यामध्ये त्यांनी आपण टीकाकारांची फारशी पर्वा करत नसल्याचे म्हटले आहे. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडीच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनीही एक खोचक ट्विट करून अमृता फडणवीस यांना टोला लगावला. त्यामुळे आता भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ट्विटवर वॉर रंगण्याची चिन्हे आहेत.
यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते उमेश पाटील यांनीही मंगळवारी अमृता फडणवीस यांना लक्ष्य केले होते. राज्यावर तौक्ते चक्रीवादळाचे संकट ओढावले असताना अमृता फडणवीस संवेदनशीलपणा दाखवण्याऐवजी राजकीय शेरोशायरी करतात. यामधून त्यांना असणारी सत्तेची लालसा दिसून येते. राज्याच्या माजी मुख्यमंत्र्यांच्या सौभाग्यवतीने संकटकाळात अशाप्रकारे वागणे योग्य नाही, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते उमेश पाटील यांनी केली होती.
आजपर्यंत जेवढे मुख्यमंत्री होऊन गेले त्यांच्या सौभाग्यवतींना मुख्यमंत्रीपद गेल्यावर जेवढं दुःख झालं नसेल तेवढं दुःख या माजी मुख्यमंत्र्यांच्या सौभाग्यवतींना झाले आहे. त्यामुळे त्या अस्वस्थतेतून शेरोशायरी करतात. अशा कठीण प्रसंगात सरकारवर संकट येईल अशी शेरोशायरी करण योग्य नाही, यावरून त्यांची सत्तेची लालसा दिसून येते. हे वर्तन माजी मुख्यमंत्र्यांच्या सौभाग्यवतीला न शोभणारे असल्याचे उमेश पाटील यांनी म्हटले होते.
काय म्हणाल्या होत्या अमृता फडणवीस?
मुंबईत सोमवारी तौक्ते चक्रीवादळाचे थैमान सुरु असताना अमृता फडणवीस यांनी ट्विट केले होते. ‘तूफ़ां तो इस शहर में अक्सर आता है ,देखें अबके किसका नंबर आता है !’, असा मजकूर या ट्विटमध्ये आहे. आता अमृता फडणवीस यांना या माध्यमातून आणखी एका राजकीय वादळाविषयी सूचित करायेच आहे का, असा प्रश्न अनेकांना पडला होता. या राजकीय वादळाचा फटका कोणाला बसणार, महाराष्ट्रातील राजकारणावर त्याचे काय परिणाम होणार, असे काही प्रश्न अमृता फडणवीस यांच्या ट्विटमुळे उपस्थित झाले होते.

