चिखलदऱ्यात नवे पोलीस विश्रामगृह पालकमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ पोलीस यंत्रणा बळकटीकरणासह दर्जेदार सुविधांची निर्मिती- पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर
अमरावती दी.27: कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस अहोरात्र कार्यरत असतात. कोरोना साथीच्या काळात जोखीम पत्करून त्यांनी अनेक जबाबदाऱ्या पार पाडल्या व आताही पार पाडत आहेत.त्यामुळे पोलीस दलाचे अधिक बळकटीकरण करण्याबरोबरच नानाविध दर्जेदार सुविधांची निर्मिती करण्यात येत आहे, असे प्रतिपादन राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी आज चिखलदरा येथे केले.
जिल्हा ग्रामीण पोलीस दलातर्फे चिखलदरा येथील हिरेकन पॉईंट येथे उभारण्यात आलेल्या पोलीस विश्रामगृहाचे पालकमंत्री यांच्या हस्ते आज उद्घाटन करण्यात आले. त्यावेळी त्या बोलत होत्या.जि.प. समाज कल्याण सभापती दयाराम काळे, चिखलदरा नगरपालिकेच्या नगराध्यक्षा विजयाताई सोमवंशी, पोलीस अधीक्षक डॉ. हरी बालाजी एन., श्रीमती श्वेता के. हरी बालाजी, अपर पोलीस अधिक्षक श्याम घुगे, पोलीस उपअधीक्षक प्रदीप सूर्यवंशी, तहसीलदार श्रीमती माने, पोलीस निरीक्षक श्री. मानकर चिखलदऱ्याचे ठाणेदार राहुल वाढवे आदी यावेळी उपस्थित होते.
पालकमंत्री श्रीमती ठाकूर म्हणाल्या की, जिल्हा पोलीस दलातर्फे पोलीस कर्मचा-यांसाठी पोलीस हेल्थ ॲप, क्लब व क्रीडा संकुल, विश्राम कक्ष, उपाहारगृह, महिलांसाठी स्वतंत्र जीम अशा अनेक उत्तमोत्तम सुविधा निर्माण करण्यात येत आहेत. यालाच जोडून चिखलदरा येथील विश्रामगृहाचीही दर्जेदार सुविधा निर्माण झाली आहे. चिखलदऱ्याच्या लौकिकाला साजेशी अशी ही निर्मिती आहे.
पोलीस अधिक्षक हरी बालाजी यांनी धडाडीने या सुविधा अंमलात आणल्या हे निश्चित वाखाणण्यासारखे आहे. त्या पुढे म्हणाल्या की, यापूर्वीही रक्षादीपसारखा चांगला उपक्रम राबवला गेला. पोलीस कर्मचा-यांवरील महत्वाच्या जबाबदा-या, अविश्रांत काम व तणाव पाहता त्यांच्या आरोग्य व मनोबल टिकवून ठेवण्यासाठी असे विविध उपक्रम उपयुक्त ठरतील. अशा अनेकविध उपक्रमांना पोलीस दलाने चालना द्यावी. चांगल्या कामांसाठी निधीची कमतरता पडू देणार नाही, अशी ग्वाही पालकमंत्र्यांनी यावेळी दिली. श्रीमती श्वेता बालाजी यांनी त्यांच्या कल्पकता व उत्तम नियोजनातून येथील विश्रामगृहात सुविधांचे सौंदर्यीकरण करून त्यांचा दर्जा उंचावला, असे त्यांनी सांगितले.यावेळी चिखलदरा उभारण्यात येणाऱ्या स्काय वॉक ची पाहणी पालकमंत्री यांच्या द्वारे करण्यात आली.

