पोलीस विभागाच्या सक्षमीकरणासाठी निधीची कमतरता भासु देणार नाही-पालकमंत्री राजेश टोपे

0 झुंजार झेप न्युज

 पोलीसांनी सर्वसामान्यांप्रती मित्रत्वाचे नाते तर गुंडप्रवृत्तीमध्ये जरब निर्माण करावी जिल्ह्यातील पोलिस ठाण्यांचे विभाजन करुन नवीन पोलीस ठाण्यांची संख्या वाढवणार

जालना दि.18 : सदरक्षणाय, खलनिग्रहणाय हे ब्रीदवाक्य घेऊन पोलीस विभाग सर्वसामान्यांच्या रक्षणासाठी अहोरात्र सज्ज असतो. समाजात सुख, शांती व समृद्धी प्राप्त होण्यामध्ये पोलीस विभागाचे कार्य अधोरेखित होते. जिल्हा नियोजन मंडळाच्या माध्यमातुन पोलीस दलाला मिळालेल्या वाहनांच्या मदतीने प्रभावीपणे पोलिसिंग करण्याबरोबरच जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखत असताना सर्वसामान्यांप्रती मित्रत्वाचे नाते तयार करत न्यायिक पद्धतीने समाजामध्ये वर्तणुक ठेवण्याबरोबरच गुंडप्रवृत्तीमध्ये पोलिसांनी जरबही निर्माण करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटूंब कल्याण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राजेश टोपे यांनी केले.

जिल्हा नियोजन मंडळाच्या माध्यमातुन पोलीस विभागासाठी सव्वा दोन कोटी रुपये खर्च करण्यात येऊन खरेदी करण्यात आलेल्या 20 चारचाकी तर 92 दुचाकी वाहनांचे लोकार्पण पालकमंत्री श्री टोपे यांच्या हस्ते पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर करण्यात आले. त्याप्रसंगी उपस्थितांशी संवाद साधताना ते बोलत होते.

व्यासपीठावर आमदार कैलास गोरंट्याल, आमदार नारायण कुचे, आमदार राजेश राठोड, जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड, पोलीस अधीक्षक विनायक देशमुख, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनुज जिंदाल, अपर पोलीस अधीक्षक विक्रांत देशमुख आदींची प्रमुख उपस्थिती होती.

पालकमंत्री राजेश टोपे म्हणाले, विकासाच्या कामात निधी देत असताना पोलीस विभाग नेहमीच दुर्लक्षित राहतो. कमी मनुष्यबळ, अपुरी साधनसामग्री यासह ईतर अनेक समस्यांचा सामना करत पोलीस विभाग सर्वसामान्यांच्या रक्षणासाठी आपल्या जीवाची पर्वा न करता अहोरात्र काम करत असतो. पोलीसांची जेवढी कार्यक्षमता वाढेल त्या प्रमाणात विकासाला चालना मिळत असल्याने या बाबींचा विचार करत जिल्हा पोलीस दलाच्या सक्षमीकरणासाठी जिल्हा नियोजन मंडळाच्या माध्यमातुन सव्वा दोन कोटी रुपयांचा निधी मंजुर करण्यात येऊन पोलीस दलाला चारचाकी व दुचाकी वाहने उपलब्ध करुन देण्यात आली आहेत. जिल्ह्यात शांतता व सुव्यवस्था अबाधित राहण्याबरोबरच चांगली समाजव्यवस्था निर्माण होण्यासाठी या वाहनांचा उपयोग व्हावा, अशी अपेक्षाही पालकमंत्री श्री टोपे यांनी यावेळी व्यक्त केली.  

जालना जिल्ह्यात लोकसंख्येच्या तुलनेमध्ये पोलीस ठाण्यांची व मनुष्यबळाची संख्या कमी असल्याने उपलब्ध मनुष्यबळावर अतिरिक्त ताण येत आहे. या गोष्टीचा विचार करुन जिल्ह्यात असलेल्या पोलीस ठाण्यांचे विभाजन करुन नवीन पोलिस ठाण्यांची संख्या वाढविण्यासंदर्भात गृहमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई येथे बैठक संपन्न झाली असुन जालना, अंबड, राजुर, घनसावंगी या ठिकाणी नव्याने पोलीस ठाण्याच्या निर्मितीबाबत सकारात्मक चर्चा झाली आहे. जिल्ह्यात नव्याने होणार असलेल्या या ठाण्यांमुळे मनुष्यबळ तसेच ईतर सोयी-सुविधा उपलब्ध होणार असल्याने पोलीसांवर येणारा ताण कमी होण्यास मदत होणार आहे. त्याचबरोबर पोलीस वसाहतींमधील रस्ते, ईमारत दुरुस्ती, दळणवळण सुधारणा आदी बाबींसाठी लागणारा निधी मिळविण्यासाठी आपण व्यक्तश: प्रयत्न करणार असल्याचे सांगत जिल्ह्यात सीसीटीव्ही उभारणीसाठी जिल्हा नियोजन मंडळाच्या माध्यमातुन आवश्यक तो निधीही उपलब्ध करुन देण्याची ग्वाही देत पोलीस विभागाच्या सक्षमीकरणासाठी निधीची कमतरता भासु दिली जाणार नसल्याचेही पालकमंत्री श्री टोपे यांनी यावेळी सांगितले.

आमदार कैलास गोरंट्याल म्हणाले, जिल्हा नियोजन मंडळाच्या माध्यमातुन पोलीस विभागाला वाहने उपलब्ध करुन देण्यात आल्याबद्दल पालकमंत्री राजेश टोपे यांचे आभार व्यक्त करत पोलीस विभागाप्रमाणेच नगरपालिकेलाही घंटागाड्या उपलब्ध करुन देण्याची मागणी त्यांनी यावेळी केली.

आमदार नारायण कुचे म्हणाले, नव्याने उपलब्ध झालेल्या वाहनांमुळे पोलीसांची कार्यक्षमता अधिक प्रमाणात वाढण्यास मदत होणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड म्हणाले, जिल्हा नियोजन मंडळाच्या माध्यमातुन पोलीस विभागाला चांगल्या पद्धतीची वाहने उपलब्ध झाली असुन या वाहनांमुळे पोलीस दलास अधिक प्रतिसादक्षम व पारदर्शकपणे काम करण्यास गती मिळणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात पोलीस अधीक्षक श्री देशमुख म्हणाले, पालकमंत्री राजेश टोपे यांच्या पुढाकारातुन पोलीस दलासाठी अत्यावश्यक असलेली वाहने उपलब्ध करुन दिल्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त करत या वाहनांचा उपयोग डायल 112, पींक मोबाईल तसेच बीट मार्शल यासाठी करण्यात येणार असल्याचे सांगुन पोलीस दलाचे आधुनिकीकरण व सक्षमीकरणासाठी आवश्यक असलेल्या कामांसाठीही निधी उपलब्ध करुन देण्याची विनंती त्यांनी यावेळी केली.

डायल 112

सध्या राज्यात सर्वसामान्य जनतेच्या मदतीकरिता प्रशासनातर्फे वेगवेगळे क्रमांक (जसे 100,101,103,1091,108 आदी) उपलब्ध आहेत. सर्वसामान्य जनतेला पुरेशा माहिती अभावी विशेषत: ग्रामीण भागातील जनता ही याबाबत संभ्रमित असते. नेमकी कोणाकडे मदत मागायची याबाबत माहिती नसल्याने मिळणाऱ्या मदतीस विलंब होतो. यासाठी संपुर्ण भारतामध्ये पॅन इंडिया या शिर्षाखाली डायल 112 हा मध्यवर्ती हेल्पलाईन क्रमांक कार्यान्वित करण्यात येत आहे. संकटकाळी डायल 112 या क्रमांकावर संपर्क करुन सर्वसामान्यांना मदत मागता येणार आहे.

पींक मोबाईल

महिला व बालकांसंबंधी गुन्हेगारीचा तंत्रशुद्ध, दर्जेदार व शास्त्रोक्त व न्यायिक तपास होण्याच्या उद्देशाने पींक मोबाईल हा उपक्रम सुरु होत आहे. या वाहनांवर महिला अधिकारी व पोलीस अंमलदार यांची नियुक्ती राहणार असुन महिलांना त्यांची तक्रार निसंकोचपणे व स्पष्टपणे याद्वारे करता येणार असल्याने गुन्हेगारांना शासन होण्यास यामुळे मदत होणार आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.