जिल्हा प्रशासनाने त्याबाबत आदेश काढले आहेत. जिल्ह्यात कोरोनाचा पॉझिटिव्हिटी रेट कमी झाल्यामुळे जिल्हा प्रशासनानं सोमवारपासून कोल्हापूर जिल्ह्यातील दुकाने सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे.
कोल्हापूर : कुठल्याही परिस्थितीत दुकानं उघडणार मग पोलीस किंवा लष्कर आलं तरी पर्वा नाही, अशी आक्रमक भूमिका कोल्हापुरातील व्यापाऱ्यांनी घेतली होती. त्यानंतर अखेर जिल्हा प्रशासनानं महत्वाचा निर्णय़ घेतला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील दुकाने सोमवारपासून उघडली जाणार आहे. जिल्हा प्रशासनाने त्याबाबत आदेश काढले आहेत. जिल्ह्यात कोरोनाचा पॉझिटिव्हिटी रेट कमी झाल्यामुळे जिल्हा प्रशासनानं सोमवारपासून कोल्हापूर जिल्ह्यातील दुकाने सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्हिटी रेट 9.7 टक्क्यांवर आला आहे. त्यामुळे सोमवारपासून कोल्हापूर जिल्ह्यात तिसऱ्या टप्प्यातील निर्बंध लागू करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्व दुकाने सोमवारपासून सकाळी 7 ते दुपारी 4 पर्यंत सुरु ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोल्हापुरात कोरोनाचा प्रादुर्भाव काही केल्या कमी होत नव्हता. मात्र, दुसरीकडे व्यापाऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतल्याचं पाहायला मिळत आहे. अशावेळी जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्हिटी रेट कमी झाल्यानंतर दुकाने उघडण्याचा निर्णय आज घेण्यात आला आहे.
सरकारच्या भूमिकेवर व्यापारी होते नाराज
बुधवारी पार पडलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत व्यापाऱ्यांना दिलासा मिळेल अशी अपेक्षा होती. मात्र, सरकारने कुठलाही निर्णय घेतला नसल्यानं व्यापाऱ्यांची निराशा झाली आहे. सरकारची संवेदनशीलता हरवली आहे का? असा सवाल व्यापाऱ्यांनी विचारला होता. दरम्यान, दोन डोस घेतलेल्या व्यापाऱ्यांना दुकाने उघडण्यास परवानगी देण्याबाबत मुख्यमंत्री निर्णय घेतील, असं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटलं होतं. मात्र, सरकारच्या या भूमिकेवरुनही व्यापाऱ्यांनी नाराजी व्यक्त केलीय.
पुरेसे डोस उपलब्ध नसताना लसीकरण कसे करणार?
कोरोना लसीचे दोन डोस घेतलेल्या व्यापाऱ्यांनाच दुकान उघडायला परवानगी सरकार देणार असेल तर ही सरकारची दुटप्पी भूमिका आहे. अशा निर्णयाला कोणताही अर्थ नाही. सगळी कारणं सांगून झाल्यानंतर सरकारचं दुकान बंद ठेवण्यासाठी हे आणखी एक कारण आहे. पुरेसे डोस उपलब्ध नसताना लसीकरण कसे करणार? असा सवाल व्यापाऱ्यांनी विचारला होता. निर्णय घेण्याआधी व्यापार्यांना प्राधान्याने लस उपलब्ध करून द्या, अशी मागणीही त्यांनी केली होती. मात्र, आता सोमवारपासून दुकानं सुरु ठेवण्यात परवानगी मिळाल्यामुळे जिल्ह्यातील व्यापाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

